मुंबई : राज्यात सत्तेची साठमारी सुरु असताना त्याच्या केंद्रस्थानी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सातारा-सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते परतीच्या पावसाने झालेल्या द्राक्ष, डाळींबासह अन्य शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. ज्या दोघांभोवती राज्याचे राजकारण फिरत आहेत ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. तर उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.


शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाशिवआघाडी स्थापन करुन राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना ठाकरे यांच्या या दौऱ्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ते सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर-आटपाडी भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसान पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे कराडमधून आपल्या पाहणी दौऱ्याची सुरुवात करणार आहे. सर्वात आधी कडेगाव पलूसमध्ये आलं या पिकाची नुकसान पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर नेवरीमध्ये सोयाबीन आणि मुगाच्या पिकाची पाहणी करतील. सांगलीतील विटा आणि साताऱ्यातील मायणीमध्ये द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. पुढे फलटणमध्ये डाळिंब आणि ज्वारी शेतीची पाहणी करणार आहेत.

राष्ट्रवादी नेते शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर -
परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कालपासून (14 नोव्हेंबर) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. प्रशासनाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भात सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यात राजकारणी व्यग्र आहेत. अशा परिस्थितीत शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी शरद पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

संबंधित बातम्या :

नागपुरात नुकसानीची पाहणी करताना शरद पवारांचं गडकरी प्रेम...!

राज्यातील सत्ताकोंडी 17 नोव्हेंबरपूर्वी फुटणार? शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश