Uddhav Thackeray on Deepak Kesarkar : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच रणकंदन सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाल्याने महाविकास आघाडीला चांगलाच जोर आला. महाविकास आघाडीकडून शिंदे गटातील मंत्र्यांवर आरोपांच्या फैरी झाडताना  शंभूराज देसाई, उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्यावरही भूखंडावरून आरोप करताना राजीनाम्याची मागणी केली. 


उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाचा सातत्याने समाचार घेण्याचा सपाटा सुरु असताना गुरुवारी एक वेगळाच प्रसंग घडला. शिंदे गटाचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे केवळे योगायोगाने काही क्षणांसाठी आमनेसामने आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या थेट सवालांनी दीपक केसरकर चाचपडल्याचे दिसून आले. (Uddhav Thackeray on Deepak Kesarkar in Nagpur winter session) 


नीलम गोऱ्हे  यांच्या दालतानातून दीपक केसरकर बाहेर पडत असतानाच समोरून उद्धव ठाकरे दालनात प्रवेश करत असतानाच दोघे थेट समोर आले. एवढ्यात उद्धव ठाकरेंनी ठाकरी बाण सोडण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी आम्ही तुमचे काय वाईट केले? तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयी कसे होऊ शकता? असे ठाकरी शैलीत बाण सोडल्यानंतर केसरकर यांना थेट उत्तर काही देता आले नाही. आपल्याला काय दिलं नाही? तुम्ही लोक आमच्याविरुद्ध चौकशी करत आहात, आमची कार्यालये ताब्यात घेतली जात आहेत. 


तुम्हाला एवढं मोठं केलं, मग निर्दयीपणे कसे वागू शकता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच केसरकर यांना कोणतेही थेट उत्तर देता आलं नाही, पण आमच्यावर अजूनही नाराज आहात का? इतकाच प्रतिप्रश्न करून काढता पाय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे नीलम गोऱ्हे यांच्या दालनात गेले. मात्र, शिंदे गटाकडून ठाकरे गटावर तुटून पडणाऱ्या केसरकर यांना ठाकरे समोर येताच मात्र, बोलताना चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. 


सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला


दरम्यान, काल बोलताना उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिंदे गट आणि भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. ते म्हणाले की, दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर जोरदार आरोप झाले. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला. राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलनं केली. परंतु, अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे. आरोप झाल्यानंतर क्लिनचिट देण्याचं काम करणार का? हा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला.  


इतर महत्वाच्या बातम्या