गोंदिया : सेल्फी घेण्याच्या नादात नदीत पडून दोन महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील राजेगाव येथील बाघ नदीवर घडली. युवा परिवर्तन संस्था मरारटोली गोंदिया नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या तरुणी आहेत.


समता न्यायकरे (20) आणि मेघा सहारे (20) असं या मुलींचं नाव आहे. नर्सिंग कॉलेजच्या नऊ मुली कॉलेज संपल्यानंतर सहलीसाठी बाघ नदीवर असलेल्या कोरनी घाटाजवळ आल्या. त्या एका मोठ्या दगडावर चढून सेल्फी घेत होत्या.

सेल्फी घेत असताना अचानक मेघा सहारे आणि समता न्यायकरे यांचा पाय घसरल्याने त्या डोहात पडल्या. लगेच बाकीच्या मुलींनी आरडाओरडा करत मदत मागितली. मात्र मदतकार्य मिळण्यापूर्वीच या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

उपस्थितांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पर्यटनस्थळी सातत्याने अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे सेल्फी घेताना किंवा पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडल्यानंतर काळजी घेण्याची गरज आहे.