Transfer Date of Govt Officers : शासकीय अधिकारी (Government officials) आणि कर्मचारी यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या (Transfer) करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट ची मुदत देण्यासाठी राज्यपालांच्या (Governor) स्वाक्षरीने अध्यादेश जारी करण्यात आला आहे. बदल्यांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) निर्णय घेतला होता.


लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळं बदल्या करण्यास विलंब


शासकीय  अधिकारी आणि कर्मचारी यांची साधारणता एप्रिल ते मे महिन्यामध्ये बदली होत असते. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च ते 4 जून 2024 पर्यंत असल्याने बदली करण्यामध्ये अडचण  निर्माण झाली होती. अवघ्या एक दिवसांमध्ये बदली करणे शक्य होणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण कोणत्याही बदलीसाठी सक्षम प्राधिकरण म्हणून नागरी  सेवा मंडळाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळं विभागाची तयारी आणि त्यानंतर नागरी सेवा मंडळाची मंजुरी यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.


दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात


राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम 2005 मधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात. मात्र यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असणाऱ्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण राबवले नाही. मात्र राज्य शासनाकडून बदली संदर्भातील नव्या आदेशाची प्रतीक्षा विभागप्रमुखांना होती. त्याप्रमाणे 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यातआली होती. त्यामुळं 31 ऑगस्टच्या आधीच म्हणजे दोन दिवसात अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जातेय.


राज्य शासनाच्या 39 विभागांतील बदलीस पात्र असलेले 31 हजार अधिकारी व कर्मचारी वेटिंगवर


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या 39 विभागांतील बदलीस पात्र सुमारे 31 हजार अधिकारी व कर्मचारी वेटिंगवर आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागातील कर्मचारी कधी बदली होणार? याकडे नजरा लावून आहेत, तर ज्यांना मलाईदार जागा हव्यात अशा महसूल, कृषी, परिवहन, वनविभाग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मंत्रालयातील पायऱ्या झिजवत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता कोणत्या विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या किती बदल्या होणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. पण बदल्यांसाठी फक्त दोनच दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळं या दोन दिवसात काय काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत ST महामंडळाचा मोठा निर्णय; आता पारदर्शकता येणार