लातूर : भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषीशी निगडीत अनेक सणवार असतात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या. उद्या वेळ अमावस्येचा सण आहे. यासाठी मराठवाडा सज्ज झाला आहे. या सणाला आपल्या शेतातल्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्व लहान थोर शेतात वनभोजनाचा आनंद लुटत असतात. सर्वजण वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी शेतात जात असल्याने लातूरमधील गावांमध्ये अघोषीत संचारबंदी लागल्यासारखी स्थिती असते. वेळ अमावस्येला बोली भाषेत येळवस असे देखील म्हटले जाते.


बैलपोळा आणि वेळअमावस्या हे सण शेतकऱ्यांच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे समजले जातात. बैलपोळयादिवशी ज्याच्या जिवावर शेती चालते, त्या बैलांची पुजा केली जाते, तसेच त्यांनी गोडधोडाचा नैवद्य देखील दाखवला जातो. तर वेळ अमावस्येदिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्या काळया आईची पुजा केली जाते. 


लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्यदिवशीची पुजा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेताततल्या लक्ष्मीची पुजा मांडली जाते. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात. यथासांग पुजा केली जाते. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी प्रार्थना केली जाते. 


वेळ अमावस्या म्हणजे काय ?
पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या. जूनमध्ये पेरणी होते. सातवी अमावस्या डिसेबंर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन सपुंर्ण शेती हिरवीगार झालेली असते. ऊनाची तीव्रता देखील नसते. वेळ अमावस्या साजरी करण्याची प्रथा कधी सुरू झाली असावी, याबाबतची निश्चित नोंद उपलब्ध नाही. वेळ अमावस्येच्या काळात लातूरसारख्या शहरी भागात तर कर्फ्यूसारखे वातावरण रस्त्यावर दिसते. आपल्यापेक्षा कोणीतरी अज्ञात शक्ती मोठी आहे. त्यासमोर वर्षातून एकदा तरी नतमस्तक व्हावे, याची शिकवणूक देणारी संस्कृती जोपासायची परंपरा यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.
         
वेळ अमावस्यातील मेजवानी 
ऊसाचे गाळप सुरू होत असल्यामुळे, वेळ अमावस्येला ऊस खाण्याची हौस भागवता येते. तसेच ऊसाच्या रसाचा आनंदही उपभोगता येतो. घरोघरी गौरीपुजनाचे महत्त्व, जितके असते तितकेच महत्त्व शेतात यादिवशीच्या लक्ष्मीपुजनाला असते. रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या रानात उंडे व अंबीलचा काला तसेच पाण्याचा चर शिंपडला जातो. तोंडातून हर हर महादेव, हरभला असे म्हणत शेतकरी सर्व शेतात फिरतो. ज्वारी व बाजरीचे उंडे, सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी व अंबिल या पदार्थांना वेळ अमावस्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो.  या व्यतिरिक्त जो तो आपल्या कुवतीप्रमाणे अन्य पदार्थ तयार करतो. नुकताच आलेला वाटाणा, तुरीचे दाणे घालून केलेली भाजी, तीळगुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावून केलेली आंबील अशा पदार्थाचा आस्वाद घेण्यात येतो. आंबील, गव्हाची खीर, भज्जी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेसा, नंतर बोर, पेरू हरबरे, असे असंख्य पदार्थ असतात. जेवण्याच्या आधी हया रानमेवानेच पोट भरून जाते. यासाठी घरातील महिला दोन दिवसांपासून तयारी करतात. 


वेळ अमावस्याचे हिवाळ्यातील महत्त्व 
हिवाळा हा मनाला उत्साह आणि नवचेतना देणारा ऋतु आहे. आयुर्वेदशास्त्रनुसार या ऋतुनुसार घेतला जाणारा आहार शरीराला मानवणारा असतो. शिवाय तब्येत कमविण्यासाठी हिवाळा अत्यंत योग्य काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू लाभदायी ठरावा. यासाठी या काळात येणारा भाजीपाला फळे भरपूर खाऊन निरोगी राहण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात.
हिवाळयामध्ये विविध भाज्या तसेच फळांचा आहार घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे या ऋतूत प्रचंड भूक लागते, तसेच पचनशक्तही चांगली कार्यान्वीत होते. हिवाळयात बाजारपेठेमध्ये आलेल्या फळभाज्या खाणे योग्य असते. या काळात त्वचा कोरडी व रूक्ष पडते, कारण शरीराला स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते. त्यामुळे या ऋतूत दुध, तुप दही , लोणी ताक यासारख्या पदार्थाचे मोठया प्रमाणात सेवन करावे. हिवाळयामध्ये शरीराला आतून उब मिळावी व थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी बाजरीची भाकरी तसेच गरम पदार्थाची घरोघरी मेजवानी असते. यामुळे दूरदुरून अनेकजण  लातुरमध्ये येतात. 


वेळ अमावस्या आणि लातूरकडे नातेवाईकांची धाव 
सोनिया रामशेट्टी या कवठाळा या गावी आल्या आहेत. त्या हैदराबादमधून आल्या आहेत. दरवर्षी मी गावाकडे येते, माहेरी येणे असतेच मात्र या सणासाठी आले की वर्षभर नाही आले तरी चालते.  कारण या दिवशी सर्व नातेवाईक शेतातच भेटतात. हा सण वर्षभर ऊर्जा देणारा असतो. यामुळे एकाही वर्षी मी ही संधी चुकवत नसल्याचे सोनिया यांनी सांगितले. 


लातूर जिल्ह्यात नौकरीनिमित्त आलेल्या बाहेरगावाच्या लोकांना या सणाचे कायमच आकर्षण असते. घरा शेजारील कोणीतरी त्यांना हमखास स्वत:च्या शेतात वेळ अमावस्येसाठी आमंत्रीत करतच असतात. लहान थोर सर्व लोक या सणांचा आनंद घेत असतो. आम्ही आमचे लातुरातील शेजारी दरवर्षी आमच्या माटेफळ यागावी नेत असतो. एक प्रकारे ही पिकनिक आहे असे समजून सर्वजण यात भाग घेतात असे अजित देशमुख यांनी सांगितले. कोरोनामुळे तसा काही फरक पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.