मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


भाजपचं मिशन बारामती, बावनकुळे बारामती दौऱ्यावर


 पवार कुटुंबीय निवडणूक प्रचाराची सुरुवात ज्या कनेरी गावातील हनुमान मंदिरातून करतात त्याच मंदिराला भेट देऊन बावनकुळेंच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद साधणार आहेत.


सायरस मिस्त्रींवर अंत्यसंस्कार


सायरस मिस्त्री यांच्यावर सकाळी 11 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत


पुण्याच्या मानाच्या गणपती विसर्जनासंदर्भात हायकोर्टात सुनावणी


पुणे शहरात लक्ष्मी रोडवरून गणपती विसर्जन मिरवणुकीच्यावेळी शहरातील पाच मानाच्या गणपतींना प्रथम मार्गस्थ होण्याची परंपरा आणि रूढी आहे. त्यानंतर अन्य गणपती मंडळांना विसर्जन मिरवणुकीला रस्ता खुला केला जातो. मात्र, अशा अटी आणि परंपरा या संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. असा दावा करत 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात धाव घेत याचिका केली आहे. 


बांग्लादेशच्या पंतप्रधानांसोबत मोदींची  द्विपक्षीय चर्चा


बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मोदींमध्ये आज चर्चा होणार आहे. त्यानंतर शेख हसीना राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेणार आहेत. 


आज भारतीय क्रिकेट संघासाठी करो या मरो ची स्थिती


आशिया कप 2020 च्या सुपर फोरमध्ये आज भारत आणि श्रीलंकेत सामना होणार आहे. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.  सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.