मुंबई : शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे सरकार महत्वाचं काम करेल आणि पाच वर्षच नाही तर पुढची अनेक वर्षे हे सरकार टिकेल असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री झाल्यास नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.


आशिष शेलार काल जे काही बोलले असतील ते शुद्धीत बोलले नसतील असा खोचक टोला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुरुवारी (28 नोव्हेंबर) महाविकास आघाडीतले सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचेही दोन नेते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे दोन नेते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. तर नाना पटोलेंची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. यावर पटोले म्हणाले, पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेल.

काँग्रेसनं आपल्या गटनेत्याचीही निवड केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कॉंग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. यावेळी खर्गे यांनी उद्याच्या रणनितीबाबत काँग्रेसच्या आमदारांना मार्गदर्शन केलं.

महाविकासआघाडीचे आमदार शेलारांना दिसले नसतील अशा शब्दांत पटोलेंनी टीका केली आहे. उद्या काँग्रेसचे आमदार शिस्तीत वागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या बंडखोर कोण आणि जाणीवपूर्वक गोंधळी कोण हे उद्या महाराष्ट्राला दिसेल असंही पटोले म्हणाले आहेत.