ठाणे : भिवंडीतील नागावमधील कासिमपुरा भागातील लूम फॅक्टरीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर यश मिळवलं. सध्या अग्निशमन दलाचे जवान कुलिंगचं काम करत आहेत, मात्र या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे.


 

लूम फॅक्टरीला सकाळी सातच्या सुमारास ही आग लागली. 'राहत मंजिल' असं या इमारतीचं नाव आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर लूम , पहिल्या मजल्यावर गोदाम आहे, तर वरील दोन मजले रहिवाशी असल्यामुळे इथे अनेक कुटुंब अडकली होती.

 

अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील 50 पेक्षा अधिक रहिवाशांना यशस्वीरित्या बाहेर काढलं.



या आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे अनेकजण अडकले होते.



या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.  ठाणे, कल्याण, अंबरनाथ या ठिकाणाहून अग्निशमनदलाचे 6 वॉटर टँकर दाखल झाले .  जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु केलं.