मुंबई :हाविकास आघाडीसाठी (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) सोपी होणार नाही. कुणीही सार्वजनिक वक्तव्यं किंवा दावे करू नये, असा इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी (Milind Deora) ठाकरे गटातील नेत्यांना इशारा झाला आहे.  ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल, असेही मिलिंद देवरा म्हणाले. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केली आहे. 


मिलिंद देवरा म्हणाले, माझे मतदार कार्यकर्ते समर्थक मला सकाळपासून कॉल करत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी एकतर्फी दावा करत आहे,  त्यामुळे तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला कुठल्याही प्रकारे वाद वाढवायचा नाही किंवा करायचा नाही. त्यांच्या एका प्रवक्त्याने मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाला शून्यापासून सुरुवात करायला सांगितली. 


मागील 50 वर्षापासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ लढवत आहे : मिलिंद देवरा


काल गिरगावच्या सभेत पुन्हा एकदा दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी त्या घटक पक्षाकडून दावा करण्यात आला. मागील 50 वर्षापासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे देवरा परिवार हा मतदारसंघ लढवत आला आहे. खासदार असो वा नसो लोकांची कामे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केली आहेत. कुठल्याही लाटेत आम्ही निवडून आलेलो नाही. काम आणि नात्यांनी आम्ही हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत जिंकला आहे, असेही मिलिंद देवरा म्हणाले. 


महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी नाही : मिलिंद देवरा


मिलिंद देवरा म्हणाले, महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही. कोणीही सार्वजनिक विधाने किंवा दावे करू नयेत. जर एखादा पक्ष औपचारिक चर्चेआधी जर अशा प्रकारे दावे करत असेल तर काँग्रेससुद्धा जागांवर दावा करू शकते आणि उमेदवार देऊ शकते. मला वाटतं हा संदेश दिल्ली आणि मुंबईतील काही महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल.


मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचे या मतदारसंघात मोठं वर्चस्व होतं. या भागातील उद्योगपतींसोबतही त्यांचे विशेष संबंध होते. मुरली देवरा यांनीदेखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हा मतदारसंघ बांधला. पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या मुरली देवरा यांचा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी निसटता पराभव केला होता.  


हे ही वाचा :


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा, फेब्रुवारीच्या अखेरीस महामेळाव्याचं आयोजन