अकोले (अहमदनगर) : वीरगाव जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आलेला पुस्तकी शिक्षणाला रोजच्या जगण्याशी जोडण्याचा प्रयत्न करणारा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुलांना ‘शिकते’ करण्याचा ध्यास घेतलेल्या जिल्हा परिषद शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मुलांचं अनुभवविश्व जाणून घेण्याचा आणि त्यावरुन त्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा अनोखा प्रयत्न भाऊसाहेब चासकर यांनी केला आहे.


काय आहे उपक्रम?

पाठ्यपुस्तकात असणाऱ्या स्वप्नवत गोष्टींच्या पलिकडे जात, विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित गोष्टींवर चर्चा करुन, त्यांचा अनुभवविश्व समजून घेऊन, शिकवण्यावर भर देण्याचा प्रयत्न भाऊसाहेब चासकर यांनी केला. विद्यार्थ्यांना ‘आई’, ‘बाप’ कसे दिसतात, कसे वाटतात, त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना काय वाटतं, काय विचार करतात इत्यादी अनेक गोष्टी चासकर यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांकडून व्यक्त समजून घेतल्या. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी सहभागी झालेल्या या उपक्रमातून काही रंजक, काही दु:खद, काही संवेदनशील, तर काही गंभीरपणे विचार करावयास भाग पाडणाऱ्या गोष्टी समोर आल्या.

“महायुद्ध, फ्रेंच, रशियन, औद्योगिक क्रांत्यांविषयी बोलताना स्वतःच्या कुटुंबाच्या इतिहासाकडे बघायला मुलांना शिकवायला हवे. अनेक मुलांना आजोबा, पंजोबाचे नावच माहिती नसते. इजिप्तची नाईल नदी सर्वाधिक लांबीची आहे, हा जगाचा भूगोल शिकवताना आपल्या गावाजवळून वाहणाऱ्या नदीविषयी मुलांसोबत बोलायला हवे. आपला गाव, भाषा, परिसर शिक्षणात यायला हवा.”, असे प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या याच म्हणण्याला ‘आई’ आणि ‘बाप’ या शब्दांमधून विद्यार्थ्यांची समज जाणून घेण्याचा उपक्रम दुजोरा देतो.

उपक्रम एक : ‘आई

‘आई शेतात फाटकी साडी घालते आणि लग्नाला किंवा गावाला जाताना नवीन साडी घालते’, सांगत विद्यार्थ्याने आईबाबतची त्याची समजच केवळ वर्णन केली नाही, तर जगण्यातील वास्तवही अप्रत्यक्षरित्या समोर आणलं आहे. जे त्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना, शिक्षकांनी शिकवण्याची पद्धत कशी ठेवली पाहिजे, हेही सांगणारं आहे. याचसोबत, ‘आई जीव लावते’, ‘घरकाम करते’, ‘आवरुन देते’, ‘शेतात काम करते’, ‘स्कूटर चालवते’ इथपासून ते 'आई मारते', 'आई रागवते' इथवर, आईची विविध रुपं इयत्ता दुसरीतल्या निरागस चिमुकल्यांनी सांगितली आहेत.



‘आई’ उपक्रमाबाबत भाऊसाहेब चासकर म्हणतात, “प्रकाशन संस्थांच्या निबंधाच्या पुस्तकातली सुविचारबद्ध, अलंकारिक, पोएटिक ‘आई’ मुले आपली स्वतःची आई म्हणून लिहितात, तिच्याविषयीच बोलतात. यातून मुलांना स्वतःची आई तितकीशी कळत नाही. आई अशी उधार, उसनवार घ्यायच्या सध्याच्या या जमान्यात, लहान-लहान मुले स्वतःच्या आईचे जगणे समजून घेत आहेत आणि त्याविषयी बोलत आहेत, लिहू बघत आहेत, हे बरेच बरे आहे.”

उपक्रम दोन : ‘बाप’  

आदर्शवत बापाच्या कथा-कहाण्यांनी भरलेल्या पुस्तकांच्या पलिकडे, आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील ‘बाप’ नेमका कसा आहे, तो काय करतो, कशाशी खातो, कसा वागतो, हे अर्थात विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. मात्र आपली शिक्षणव्यवस्थाच एका काल्पनिक जगाकडे झुकलेली असातना, विद्यार्थ्यांना वास्तव जगात आणणाऱ्या भाऊसाहेब चासकरांच्या उपक्रमाचं कौतुक होणं, हे अपरिहार्यच मानायला हवेत.



‘बाप भाजी विकतो’, ‘शेतात जातो’, ‘दुकान चालवतो’, ‘आजारी पडल्यावर दवाखान्यात घेऊन जातो’ इथपासून ते ‘काठीने मारतो’, ‘शिव्या देतो’, ‘आईला मारतो’, ‘रागावतो’, ‘गुटखा-तंबाखू खातो’, ‘दारु पितो’ इथवर.. बापाची विविध रुपे आणि भूमिका सांगणारे हे चिमुकले भारावून टाकतात.

बापाबद्दलची निरीक्षणं विद्यार्थ्यांकडून जाणून घेताना, एका मुलीने आपण वडिलांसोबत राहत नसल्याचे सांगितले. या मुलीचे भावविश्व किती खोल आणि संवेदनशील असेल!, हे भाऊसाहेब चासकर यांनी भावनाप्रधान होत नमूद केले.

एकंदरीत, लहान मुलांना काही कळत नाही, असे अनेकदा वयाने मोठी माणसं हिणवताना दिसतात. मात्र, चिमुकली मनं आपला भोवताल किती नेमकेपणाने टिपत असतात आणि त्यांच्या मनावरही त्याचे किती खोल पडसाद उमटत असतात, हेच या उपक्रमातील हे चित्रसांगतं.

कोण आहेत भाऊसाहेब चासकर?

भाऊसाहेब चासकर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वीरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ते अॅक्टिव्ह टीचर्स फोरम या प्रयगोशील शिक्षकांच्या संघटनेचे संयोजकही आहेत. 2012 साली अभ्यासक्रम पुनर्रचना समितीत मराठी विषयाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

प्रयोगशील शिक्षक म्हणून चासकर महाराष्ट्राला परिचित आहेत. शिवाय, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ख्याती आहे. शिक्षण, पर्यावरण, तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध विषयांवर वृत्तपत्र, संकेतस्थळ, नियतकालिकांमध्ये स्तंभलेखनही भाऊसाहेब चासकर करतात.

प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर

उपक्रमामागची चासकरांची भूमिका काय आहे?

“आपली शिक्षण पद्धत केवळ हुशार मुलांना पुढे घेऊन जातेय, अशी टीका आपल्या शिक्षण पद्धतीवर होते. मात्र, सगळ्या मुलांना ‘शिकते’ करणारी शाळा मला व्यक्तिश: आवडते. सगळ्यांना ‘शिकते’ करायचे, तर आधी सगळ्यांना ‘बोलते’ करायला हवे. ‘बोलते’ करायला मुलांच्या भावविश्वातले साधे-साधे विषय देता यायला पाहिजेत. ब्रेन मॅपिंगमधून विषय मिळतात. मुले मोकळी होतात, बोलकी होतात. यातूनच अशाप्रकारच्या उपक्रमाची कल्पना सूचली.”, असे शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी एबीपी माझा वेब टीमशी सांगतले.

“गावखेड्यातील मुलांकडे सांस्कृतिक भांडवल कमी पडते. शिक्षणाचा आशय शिकताना बराच परिणाम करतो. लाजरी-बुजरी असतात. मुलं बोलत नाहीत. त्यांना ‘बोलतं’ करण्यासाठी शिक्षकांकडे विशिष्ट समज असली पाहिजे. यासाठी दोन गोष्टी करायला पाहिजेत. एक म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आवश्यक ते बदल केले पाहिजेत. शिक्षकांना प्रशिक्षणांतून हायक्वालिटी इनपुट मिळायला पाहिजेत. पाठ्यपुस्तकांच्या चौकटीतून बाहेर येऊन उपक्रम, कृती यातून मुलांच्या भावविश्वात शिरून काहीतरी करत राहायला हवे. मी शिक्षक म्हणून हेच करत आहे.” असेही भाऊसाहेब चासकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

“शाळेबाहेरील वास्तवाला भिडायचा प्रयत्न आमच्या शिक्षणाने करायला हवा. ‘जगणे’ आणि ‘शिकणे’ याचा नीट मेळ घालणाऱ्या, त्यातले अंतर(दरी) कमी करणाऱ्या शाळा आणि तेथील शिक्षक भले असतात.”, असेही भाऊसाहेब चासकर यांनी नमूद केले.