मुंबई : तौक्ते चक्रीवादळात (Tauktae Cyclone) बुडालेल्या बार्ज P 305 (Barge P 305) प्रकरणी मुंबई पोलिसांनी पहिली अटक केली आहे.  या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. मुंबईतील यलो गेट पोलिस स्टेशनने पापा शिपिंग कंपनीचे मॅनेजर प्रसाद गणपत राणे, पापा शिपिंग कंपनीचे संचालक नितीन दिनानाथ सिंह आणि तांत्रिक सुप्रीडेंट अखिलेश तिवारी यांना अटक केली आहे. 


बार्ज पी 305 वर असलेल्या कर्मचार्‍यांपैकी 22 कर्मचारी पापा शिपिंग कंपनीचे होते. त्यांच्या  सुरक्षेची जबाबदारी अटक केलेल्या तिन्ही लोकांवर होती. पापाने शिपिंग कंपनीने जर  चक्रीवादळापूर्वी आपल्या कर्मचार्‍यांना बोलवले असते तर त्याचा जीव वाचला असता. मात्र या तौक्ते चक्रीवादळाच्या धोक्याला यांनी कमी आखलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावलं नाही.तसेच बार्जची मेंटेनन्सची जबाबदारी सुद्धा त्यांची होती आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची सुद्धा जबाबदारी होती.  ज्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं


मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 65 किलोमीटर दूर (35 सागरी मैल) च्या भागात ONGC साठी काम करणाऱ्या AFCONSच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी  बार्ज पापा 305 म्हणजेच P-305 तयार करण्यात आले.  हे संपूर्णपणे तौक्ते या शक्तिशाली चक्रिवादळाच्या तडाख्यात सापडलं. या बार्जवर 261 जण होती.17 मे रोजी चक्रीवादळाच्या विळख्यात आलं. 


काय घडलं नेमकं त्या दिवशी? 


17 मे रोजी चक्रीवादळाच्या विळख्यात येण्यापूर्वी बार्जचे नांगर खोलण्यात आले. ज्यामुळे ते वादळी वाऱ्यांमध्ये वाहू लागलं. वादळात अतिशय भीतीदायकपणे वाहणारं हे बार्ज जहाज एका रिगवर आदळलं आणि त्यामध्ये छिद्र तयार झालं, ज्यामुळं त्यात पाणी जाण्यास सुरुवात झाली. 17 मे च्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत भारतीय नौदलानं बार्जवर अडकलेल्यांच्या मदतीसाठी नौदलाच्या युद्धनौका पाठवल्या. INS कोची , INS कोलकाता, कोस्ट गार्ड आणि ONGC च्या जहाजांच्या मदतीनं बचावकार्याला सुरुवात झाली. पण, या साऱ्यामध्ये समुद्रात उसळणाऱ्या 8-10 मीटर उंच लाटा आणि 100 किमी प्रतीतास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी मात्र अडचणी आणखी वाढवल्या.  सायंकाळी 4-5 वाजण्याच्या सुमारास हे बार्ज समुद्रात बुडू लागलं, ज्यामुळं बार्जवर असणाऱ्या सर्व लोकांना समुद्रात उड्या मारण्यास सांगण्यात आलं. बार्जचे 14 लाईफ राफ्ट पाण्यात उतरवण्यात आले खरे, पण ते सर्वच पंक्चर होते. या दरम्यानच जीव वाचवण्यासाठी म्हणून बार्जच्या कॅप्टन राकेश वल्लभ यांच्यासह सर्वजण पाण्यात उतरले.


बार्ज पी-305 प्रकरणात यलो गेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जचे चीफ इंजिनियर मुस्तफिजूर रहमान यांच्या जबाबानंतर बार्जचे कॅप्टन राकेश वल्लभ आणि इतरांवर भारतीय दंड संविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 304(2),338 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली. ज्यामध्ये हवामान खात्यानं धोक्याचा इशारा दिलेला असतानाही कॅप्टननं कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकल्याचं म्हटलं गेलं. 'ओएनजीसी'च्या हिरा इंधन विहीर परिसरात 'पापा 305' ही बार्ज समुद्रात बुडाली. ही इंधन विहीर ओएनजीसीची होती, तर बार्जचे परिचालक अॅफकॉन्स या कंपनीचे होते. अपघातावेळी 261 कर्मचारी तेथे कार्यरत होते. त्यातील 186 कर्मचाऱ्यांना वाचविण्यात नौदलाच्या बचावपथकांना यश आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही जणं बेपत्ता आहेत. चक्रीवादळात जलसमाधी घेतलेल्या पी 305 या बार्जवरील कामगारांच्या मृत्यूप्रकरणी येलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. या तिघांविरूद्ध कलम 304(2), 338,34  ipc अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या दिवसामध्ये अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.