नवी दिल्ली: एकीकडे सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुरू असताना तिकडे ठाकरे गटासाटी वेगळी कसोटी असणार आहे. कारण सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातली (Election Commission)  ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी स्वतंत्र बेंच समोर होणार आहे.


 सध्या सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी ज्या घटनापीठासमोर आहे त्या घटनापीठसमोर निवडणूक आयोगाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी होणार नाही. तर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. यामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिंहा आणि न्यायमूर्ती पारडीवाला असणार आहे.  सत्तासंघर्षाची नियमित सुनावणी सुरुच आहे. ती पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे.  आज सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस  आहे.  


ठाकरे गटाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात 941  पानांची याचिका दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हा एकनाथ शिंदे गटाला दिलं. याला ठाकरे गटानं आव्हान दिले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचं तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ आज दुपारी साडेतीन वाजता सुनावणी करणार आहे. 


निवडणूक आयोगाच्या निर्णयात सुप्रीम कोर्ट काही दखल देणार का हेही पाहावं लागेल. कारण 1968 च्या सादिक अली केसमध्ये निवडणूक आयोगाचा याबाबतचा अधिकार सर्वोच्च असल्याचं सुप्रीम कोर्टानेच मान्य केलं होतं. 


 सुप्रीम कोर्टात धनुष्यबाणाच्या निकालाचे काय पडसाद?



  • कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती द्यावी अशी ठाकरे गटाची मागणी आहे

  • सप्टेंबर 22 मध्ये याच घटनापीठाची स्थापना झाल्यावरही निवडणूक आयोगाची कार्यवाही कोर्टाच्या निकालापर्यंत थांबवण्याची विनंती केली गेली होती, पण याच पीठाने आयोगाला निर्णयाची परवानगी दिली होती

  • शिवसेना हा पक्ष शिंदेचाच आहे यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं, मग सुप्रीम कोर्टात पक्षांतर बंदीसारख्या मुद्द्यावरच्या चर्चांवर कोर्ट काय वेगळा निर्णय देणार?


ठाकरे गटाच्या याचिकेचे मेन्शनिंग करण्यास काल सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाद मागितलेय. यावर काल तात्काळ सुनावणीस सुप्रीम नकार दिला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केली  होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :