Swabhimani Shetkari Saghtana : शेतकरी (Farmers) प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन स्वाभिमानीच्या वतीनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन (Agitation) करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टींनी केलाय.

  


नेमक्या मागण्या काय आहेत?


शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तसेच बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी केली आहे. 


इस्लामपूरमधील आंदोलनात राजू शेट्टी सहभागी होणार


वीज दरामध्ये करण्यात येणारी 37 टक्के दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. रात्री वीज दिल्यामुळं जंगली जनावरे आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा बळी जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सकाळी 11 वाजता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. तसेच बुलढाण्यातही सकाळी 11 वाजता मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट-बकाल इथं रास्ता रोको आंदोलन होणार आहे.


Raju Shetti : आमची आरपारची लढाई


दिवसा वीजेसाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून आंदोलन करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी अजून किती सोसायचं? ऊस तोडणी मुकादमाकडून शेतकऱ्यांची कोट्यवधी रूपये लुबाडले जात आहेत. बुडवणारे मोकाट फिरत आहेत. पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. कारखाने हात वर करतात. मात्र यामध्ये बळी शेतकऱ्यांचा जात असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं आता आमची सहनशिलता संपली आहे. राज्य सरकार विरुद्ध आमची आरपारची लढाई असणार असल्याचे शेट्टी म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Raju Shetti : जनरल डायरने जन्माला घातल्यागत वागता, बळीराजा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल