अहमदनगर : कारखानदार, आंदोलक आणि सरकारच्या प्रतिनिधिंमध्ये झालेल्या बैठकीनंतर ऊस आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. ऊसाला पहिली उचल 2525 रुपये देण्यात येईल. एफआरपीचा 70-30 चा फॉर्म्युला मान्य करण्यात आला आहे. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे.


शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सहा पोलीस अधिकारी आणि दोन शेतकरी जखमी झाले. आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. रास्ता रोको केल्याप्रकरणी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल 13 तर आज 9 जणांना अटक करण्यात आली.

ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. इतकंच नाही तर पोलिसांनी हवेत गोळीबारही केल्याचं सांगण्यात येत आहे.

या गोळीबारात भगवान मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहे.दरम्यान, गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला.

राज्यात अनेक ठिकाणी ऊस दराचं आंदोलन सुरु आहे. पैठण तालुक्यातील पाटेगावातही ऊस दर आंदोलनानं पेट घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी टायर पेटवले. पोलिसांनी शेतकऱ्यांना आवरण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन हा एल्गार पुकारला आहे.

तर सोलापूरमध्येही शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी मंगळवेढा रोडवर माचणूर जवळ रस्तारोको केला.
पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

संबंधित बातमी : ऊसदर आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार, 2 जखमी