अहमदनगर : ऊसदराचा प्रश्न मार्गी न लागल्यास, राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. शिवाय, आंदोलकांवरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील तुपकरांनी केली.


साखर कारखान्यात काही पोलीस अधिकाऱ्यांचे शेअर असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे, अशी गंभीर माहिती देत तुपकरांनी या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

ऊसदर आंदोलन पेटलं!

ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. इतकंच नाही तर पोलिसांनी हवेत गोळीबारही केल्याचं सांगण्यात येत आहे.

या गोळीबारात भगवान मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहे. दरम्यान, गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला.

दुसरीकडे आंदोलकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर दगडफेक करुन काचा फोडल्या.

राज्यात अनेक ठिकाणी ऊस दराचं आंदोलन सुरु आहे. पैठण तालुक्यातील पाटेगावातही ऊस दर आंदोलनानं पेट घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी टायर पेटवले. पोलिसांनी शेतकऱ्यांना आवरण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन हा एल्गार पुकारला आहे.

तर सोलापूरमध्येही शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी मंगळवेढा रोडवर माचणूर जवळ रस्तारोको केला. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.