ठाणे : आदिवासी माणूस ढोर नाय माणूस हाय’, ‘कामानेवाला खायेगा, लुटनेवाला जायेगा’ असं म्हणत आज ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आदिवासींचा मोर्चा धडकला. राज्य सरकारने अंत्योदय लाभार्थीयांच्या विरोधात शासनाने दिलेला आदेश तात्काळ रद्द करावा, तसेच  इतर मागण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.


ठाण्यातील शिवाजी मैदान येथून सुरु झालेल्या या मोर्चाची सांगता सिव्हिल रुग्णालयमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी मोर्चेकरांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चात रेशनवर मिळणारं गहू, तांदूळ आणून प्रतिकात्मक मोर्चा काढण्यात आला होता. तसेच फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

राज्य सरकारच्या नागरी पुरवठा विभागाने नुकतेच सरकारच्या पात्र प्रत्येक जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेत केवळ 1 किंवा 2 व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींना प्राधान्याने कुटुंब लाभार्थीची शिधापत्रिका देण्यात यावी, तसेच अन्न अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरु करण्यात यावीत, तसेच प्रलंबित वन हक्क दाव्यांवर तात्काळ निर्णय द्यावा इत्यादी मागण्यांसाठी सदरचा मोर्चा काढण्यात आला होता.

आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाणे, रायगड, पालघर, नाशिक जिल्ह्यांमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. आज मोर्चाचे रुपाने सरकारला इशारा देत असलो तरी भविष्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास स्थानावर धडकणार असल्याचा इशारा देखील मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.