मुंबई : दर महिन्याच्या 7 ते 8 तारखेपर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांचा (ST Employee)  पगार होत असतो मात्र आता 9 तारीख उलटून देखील अद्याप कर्मचाऱ्यांचे पगार (Salary)  झाले नाहीत. राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी मंडळाचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shreerang Barge)  यांनी दिलीय. तसंच शासन एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात गंभीर नसल्याचंही बरगे यांनी म्हटलंय. 


एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा रखडले  आहे. एसटी महामंडळाकडून मागणी केलेली 327  कोटी रुपयांच्या डिसेंबर महिन्यातील विविध सवलतींच्या रकमेचीपूर्ती राज्य सरकारकडून न झाल्याने पगार रखडला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सर्वसाधारण दर महिन्याच्या 7 ते 8 तारखेपर्यंत होत असतो. एसटी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 88 हजारांच्या घरात आहे. 


शासन सहानुभुतीच्या फक्त गप्पा मारतं : श्रीरंग बरगे


महाराष्ट्र एसटी कर्मचारी  मंडळाचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. शासन एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात गंभीर नाही . शासन सहानुभुतीच्या फक्त गप्पा मारतं, जाहिरातीत फक्त गप्पा दिसतात . राज्य सरकारनं तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे द्यावे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि-सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची 10 तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही, हा न्यायालयाचा अवमान असून शिंदे- फडणवीस सरकारची ही कामगार विरोधी भूमिका उघड झाली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. 


वेतन कधी मिळणार?


एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे सरकारच्या बजेटमध्ये तरतुद केली जाईल आणि महिन्याला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात संप काळात मान्य केले होते.  सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. आता अजून काही दिवस वेतन लांबेल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पगाराला उशीर होत असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे.


हे ही वाचा :


राज्यातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार; मंत्री दादाजी भूसेंची विधानसभेत मोठी घोषणा