सोलापूर : गिरणगाव, महाराष्ट्रातील मँचेस्टर अशी ओळख असलेलं शहर म्हणजेच सोलापूर. काळानुरुप सोलापुरातील सूतमील बंद पडल्या आणि सोलापूरची ओळख फक्त इतिहासांच्या पानावरच राहिली. आता इतिहासाच्या सुवर्ण पानांवर लिखित असलेली ही ओळख पुसण्याचा प्रयत्न देखील सत्ताधाऱ्यांकडून सुरु झाला आहे.


सोलापुरात 1898 साली निर्माण करण्यात आलेली 31 एकर जागेवरील नरसिंग गिरजी मिल विकासाच्या नावावर गिळंकृत करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांमार्फत केला जातो आहे. पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांनी ही 1898 साली ही मिल उभारली नंतर ती नरसिंग गिरजी कापड गिरणी झाली. 1952 नंतर ही गिरणी बंद पडली. तेव्हा ती शासनाच्या अखत्यारित चालविण्यात आली. सोलापूरच्या स्थानिक उद्योजकांने पुढाकार घेऊन उभारलेली पहिलीच कापड गिरणी होती.

संपूर्ण देशात बेसॉल्ट दगडावर कामगिरी केलेल्या खूप कमी इमारती आहेत. एन. जी. मिल त्यापैकी एक. मात्र या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याऐवजी विक्रीचा घाट घातल्याने त्याचा विरोध केला जातोय.

गेल्याच महिन्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल झाले. या फेरबदलापूर्वी वस्त्रोद्योग खाते सहकारमंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांच्याकडेच होते. त्यांच्याकडून खाते काडून घेतल्याच्या एका आठवड्यातच सोलापूरच्या नगरसिंग गिरजी कापड गिरणीतील सर्व जुन्या वास्तूंचे पाडकाम करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या.

सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सतत कोणत्या ना कोणत्या वादात नेहमीच सापडत असतात. सोलापूरकरांचा या ऐतिहासिक वास्तूच्या विक्रीला विरोध होत असताना देखील गिरणीच्या जमीनविक्रीत सुभाष देशमुख यांचा कमालीचा रस दिसून येतो आहे आणि त्यामुळेच सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हं आहेत.

एनजी मिलच्या जागेतील ऐतिहासिक वास्तूंना धक्का न लावता गारमेंट पार्क उभारण्याचा प्रस्ताव देखील सुभाष देशमुख यांनीच पुढे आणला होता. मात्र आता भूमिका बदलत वारसा वास्तूंचे जतन करण्यापेक्षा भविष्यात आणखी भव्य इमारती उभारता येतील असेही वक्तव्य सहकारमंत्र्यांनी केलं. त्यासाठी अजब दाखला देखील दिला.

विकासाला कोणाचीच हरकत नाहीये. अर्थात कोणी विरोध करता कामा नये मात्र विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वास्तूंचे पतन होऊन लोकांची घरं भरली जाऊ नयेत इतकीच इच्छा...