पंढरपूर : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार आहे. इंदापूरला  टीएमसी पाणी देण्याच्या आदेशानंतर जिल्ह्यातील वातावरण तापले.  पालकमंत्री भरणे यांनी पाणी नेणार नसल्याचा केला खुलासा तर बारामती लोकसभा स्थिरीकरणासाठी पाण्यावर डाका टाकल्याचा खासदार रणजित निंबाळकर यांचा घणाघात केला आहे. 


कायम दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर तसे राजकारण नेहमीच चालत आले आहे. मात्र आता पुन्हा एका शासकीय आदेशाने जिल्ह्यात पुन्हा पाणी तापू लागले आहे. एका बाजूला कोरोनाचे जीवघेणे संकट आ वासून उभे असताना जलसंपदा विभागाने काढलेल्या एका आदेशाने इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिलासा मिळणार असला तरी संपूर्ण सोलापूर जिल्हा यात होरपळून निघणार आहे.
 
 उजनी धरणाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगढे येथे नवनी मुठा उजवा कालवा येथे सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्यासाठी नावाने जलसंपदा विभागाने काढलेल्या पत्राने सध्या सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूरला जाणार यावरून सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या टीकेचा रोख बारामतीकडे केला आहे. कोरोनाचे महाभयंकर संकट सुरु असताना यात हा आदेश काढलाच कसा हा प्रश्न आता पुढे येत असून मुख्यमंत्र्यांनी हा अन्यायकारक आदेश तातडीने मागे घेण्याची संतप्त मागणी सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. हे पाणी फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या स्थिरीकरणासाठी नेले जात असून याला रस्त्यावर आणि न्यायालयात जोरदार विरोध करणार असल्याचा इशारा माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी दिला आहे.


 उजनी धरणातील पाण्यावर तसा बऱ्याच मंडळींनी डोळा ठेवल्याने मूळ उजनी धरणाच्या उभारणीतून विस्थापित झालेल्या विस्थापितांवर अन्याय झाल्याची भावना येथील धरणग्रस्त बोलून दाखवत आहेत . तर या निर्णयाने शेतकरी उध्वस्त होईल अशी संतप्त प्रतिक्रिया सुभाष म्हस्के या शेतकऱ्याने दिली आहे.


 पालकमंत्र्यांनी पंढरपूर प्रचारात मंगळवेढ्याच्या दुष्काळी 35 गावांचा पाणी प्रश्न सोडवायचे आश्वासन दिल्याची आठवण भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनी करून दिली असून जिल्ह्याच्या वाट्याचा एक थेंबही उचलू देणार नसल्याचा इशारा अवताडे यांनी दिला आहे. हा निर्णय जाहीर होताच करमाळा तालुक्यात सर्वात जास्त उद्रेक व्यक्त होऊ लागला असून या तालुक्यातील अनेक गावच्या गावे धरण उभारणीत विस्थापित झाली असल्याने केत्तूर येथे शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी तर थेट पालकमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत त्याला उजनी जलाशयात जलसमाधी दिली.


      वास्तविक अजून 110 टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणातून मराठवाड्याला द्यायचे 21 टीएमसी पाणीही दिले गेले नाही.  सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या अक्कलकोट , सांगोला , मंगळवेढा , दक्षिण सोलापूर , करमाळा व माढा या भागातील योजना पूर्ण झाल्या आहेत . अशा स्थितीत सध्या उजनी जलाशयात असणाऱ्या पाण्याचे 100 टक्के वाटप यापूर्वी झाले असताना हे पाणी कोठून उपलब्ध करणार असा सवाल शिवसेना आमदार शहाजी पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे.


पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या सांड  पाण्याचा उपसा करण्याबाबत हा संभ्रम वाढवणारा आदेश जलसंपदा विभागाने काढला असून उजनी धरणावरुण नेमके किती सांडपाणी येते आणि धनरानात किती पोहचते याचा खुलासा होणे आवश्यक आहे. वास्तविक हे येणारे सांड पाणी वर्षानुवर्षे उजनी धरणात मिसळत असून त्याचीही मोजदाद एकूण पाण्याच्या गणितात होत आली आहे. वरून येणारे सांड पाणी 125 किलोमीटर अंतर कापून खरेच इंदापूरपर्यंत पोहचते की ते मधेच उचलले जाते याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे . अन्यथा सांडपाण्याच्या नावावर सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर पुन्हा एकदा ही मोठी चोरी ठरणार आहे . 
 
सोलापूर जिल्ह्याचे एक थेंबही पाणी नेऊ देणार नाही असा पवित्रा  करमाळ्याचे  माजी आमदार नारायण पाटील आणि दिग्विजय बागल यांनी घेतली आहे. या प्रश्नावर आता जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या आमदार खासदार यांनी एकत्र येत याला विरोध करावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे. दरम्यान सर्व जिल्हा अंगावर येऊ लागल्याचे लक्षात येताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे थेंबभरही पाणी इंदापूरला नेणार नाही आणि तसे झाले तर राजकीय संन्यास घेऊ अशी भूमिका घेतली आहे. मात्र असे असेल तर कोरोनाचे एवढे मोठे संकट सुरु असताना हा आदेश निघालाच कसा याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही.


 पुणे परिसरातील सांडपाणी दिले जाणार असल्याचे आदेशात म्हणाले जात असले तरी हे सांडपाणी काय सदस्य तयार होणार नसून वर्षानुवषे हे पाणी उजनी धरणात मिसळत आहे. उजनीच्या एकूण पाण्यामध्ये हे पाणीही धरूनच हिशोब झालेला असेल तर 5 टीएमसी पाणी शिल्लक राहणार याचे उत्तर जनतेसमोर येणे गरजेचे असल्याची शेतकऱ्यांची मागणी आहे . सुरुवातीला बारमाही असलेले उजनी धरण नंतर आठमाही झाले आणि आता तर याचा जास्तीतजास्त वापर पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे . उन्हाळ्यात जिल्ह्यात सुरु असलेले शेकडो टँकर केवळ उजनीवर अवलंबून असतात. अशात जर हे 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला तर आधीच तहानलेल्या सोलापूर जिल्ह्याचा घसा कायम तहानलेला राहणार आहे.