हिंगोली : मागील काही महिन्यांत हळूहळू कोरोना (Corona) रुग्णसंख्या कमी होत असताना ओमायक्रॉन (Omicron) हा नवा व्हेरियंट आला आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे राज्यभरात पुन्हा निर्बंध लावण्यात आले. ज्यामुळे जवळपास सुरु होण्यासाठी सज्ज झालेल्या शाळा पुन्हा बंद करुन (School Closed) ऑनलाईन शिक्षण (Online Education) सुरु ठेवण्यात आले. पण इतर सर्व व्यवसाय सुरु असताना शाळाच का बंद? असा सवाल करत हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे काही विद्यार्थी पोहोचले.

Continues below advertisement


या विद्यार्थ्यांनी पोलिसांना, 'सर्व व्यवसाय सुरू, दुकानं सुरु मग आमच्या शाळा का बंद? असा प्रश्न विचारत, 'शाळा बंद असल्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यामुळे पोलीस काका तुम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करा आणि आमच्या शाळा सुरू करा' अशी मागणी विद्यार्थ्यांनी पोलिसांना केली आहे. दरम्यान हे सर्वजण हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.


पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन


दरम्यान विद्यार्थ्यांच्या या सर्व मागण्या पोलिसांनी ऐकून घेतल्या. ज्यानंतर सर्व मागण्याचे एक निवेदन पोलिसांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. यामध्ये शाळा सुरू करण्याची विनंती पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. पण विद्यार्थ्यांनी पोलीस स्थानकात केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पोलिसांचा मात्र गोंधळ उडाला होता.


राज्यात 39 हजार 207 नवे कोरोनाबाधित


राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाच्या  39 हजार 207  नव्या रुग्णांची भर झाली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 38, 824 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha