नागपूर : शिवसेनेनं कितीही विरोध केला, तरीही नारायण राणे यांची फडणवीसांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर मुख्यमंत्री ठाम असल्याची माहिती 'एबीपी माझा'च्या सूत्रांनी दिली आहे.


ज्याच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे, अशांना मंत्रिमंडळात कसं घेता? असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपला केला आहे.

राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची बातमी काल आली होती. त्यानंतरही भाजप राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.

मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा कोटा आहे. भाजपच्या कोट्यातून नारायण राणेंना मंत्रिमंडळावर घेतलं जाणार असल्याने शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न उरणार नसल्याचं म्हटलं जातं. शिवाय, नारायण राणेंना शिवसेनेचा विरोध जुनाच आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. राणे यांचा पक्ष एनडीएमध्ये दाखल झाला आहे.