Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस गडद होत चालला आहे. शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असून एकापाठोपाठ एक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटाकडे धाव घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सातत्यानं भाजपवर आगपाखड करत आहेत. हा सगळा भाजपचाच कट असल्याचा आरोप सातत्यानं संजय राऊतांकडून केला जात आहे. तसेच, आमदारांना डांबून ठेवण्यामागेही भाजपचाच हात असल्याचंही संजय राऊत वारंवार सांगत आहेत. आता राऊतांनी शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा नवा दावा केला आहे. 


"सोडून गेलेल्या काही आमदारांशी आमच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्यातील काहीजण अद्यापही आमच्या संपर्कात आहेत. ते सांगतात, आम्हाला कसं जबरदस्तीनं नेलंय तिकडे. आज आमच्या दोन आमदारांची पत्रकार परिषद आहे. नितीन देशमुख आणि कैसाल पाटील तुम्हाला सगळी कथा सांगतील. अशाप्रकारे किमान 17 ते 18 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत." असं संजय राऊत म्हणाले. मी भारतीय जनता पक्ष हाच शब्द वापरतोय. कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही, असा घणाघाती आरोपही संजय राऊतांनी भाजपवर केलाय. 


शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "ईडीच्या किंवा इतर काही अमिषांना बळी पडून जर आमदार काही पळाले असतील, विशेषतः ते स्वतःला बछडे आणि वाघ वैगरे म्हणून घ्यायचे, तर ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. हा पक्ष अद्याप मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उभा आहे. 4 आमदार, अजून कोणी दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत. हे का गेलेत सोडून, याची कारण लवकरच समोर येतील." 


दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद : संजय राऊत 


आज मुख्यमंत्री कोणतीही बैठक घेणार नसून वर्षावर काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ते जाणार आहेत. त्यानंतर आमचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख पत्रकार परिषद घेतील. यावेळी पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित असतील. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कोणतंही आवाहन केलेलं नाही. या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं एवढंच सांगायचं आहे.", अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 



"20 आमदार आमच्या संपर्कात असून ते मुंबईत आल्यानंतर खुलासा होईल. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता तुम्हाला दिसणार नाही. आम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे. आपण बाळासाहेबांचे भक्त आहोत इतकं म्हणणं पुरेसं नाही. दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही. आमच्यावरही दबाव आहे. आमचा एक मंत्री चार दिवस ईडीच्या कार्यालयात जाऊन बसतोय, पण त्यानं पक्ष सोडला नाही. मी आणि माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटुंबासोबत राहणार", असं संजय राऊत म्हणाले.