भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी 23 दिवसांच्या घरोब्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देवून शिवबंधन बांधलय. विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यान बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून भाजपला आव्हान दिल होतं. युतीचा उमेदवार असतानाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी बाळसाहेब सानप यांची भेट घेऊन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र, निवडणुकीत सानप यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येण्यात बाळासाहेब सानप यांचा मोलाचा वाटा होता. भाजपचे 66 नगरसेवक निवडून आले होते. यात सानप यांच्यामुलासह समर्थकांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीत सानप यांच्या समर्थकांनी पक्षविरोधी काम केल्यानं त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आलाय.
नाशिक महापालिकेत एकूण 122 नगरसेवक आहेत. पैकी भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने राजीनामा दिल्यानं भाजपचे सध्या 65 तर शिवसेनेचे 34 सख्याबळ आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी 6 मनसेचे 5 अपक्ष 3 आणि आरपीआय आठवले गटाचा एक नगरसेवक असे मनपातील पक्षीय बलाबल आहे. सध्या शिवसेनेकडे विरोधीपक्षनेतेपद आहे. बाळासाहेब सानप यांचा शिवसेना प्रवेश झाल्यानं त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या जोरावर महापौरपद मिळविण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे. त्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक महिनाच्या अंतराने नाशिक महापालिकेत महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होणार असून आकडेमोड करायला आतापासूनच सुरुवात झालीय.
राजकारणात काहीही होऊ शकते, असा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे शिवसेनेला पाठींबा देतील का? सत्तेच्या सारीपाटात आपली राजकीय कारकीर्द धोक्यात घालून किती नगरसेवक बाळासाहेब सानप यांच्या पाठीशी उभे राहतात हे बघणे महत्वाचे आहे. कारण यावरच पुढची गणितं अवलंबून आहेत.