Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Politics) आज होणाऱ्या सुनावणीबाबत अद्याप अनिश्चितता असल्याचं दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अद्याप त्याचा समावेश नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आज सकाळी ऐनवेळी हे प्रकरण सुनावणीस येणार का? याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तारीख पे तारीखच्या सत्रात राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या (Shiv Sena) मागणीनंतर 23 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय खंडपीठानं दिला. आता या प्रकरणी पुढील सुनावणी आज म्हणजेच, गुरुवारी घटनापीठासमोर होणार असल्याचं खंडपीठानं सांगितलं होतं. तसेच, या सुनावणी वेळी पक्षाच्या चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार, असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. पण गुरुवारपर्यंत निर्णय न घेण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता घटनापीठापुढे होणार असून निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 


शिवसेनेच्या मागणीनंतर 23 ऑगस्ट रोजी सुनावणी 


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्यानं पुढं ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती.


महाराष्ट्रात (Maharashtra) नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु झालं आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या.  


सत्तासंघर्षात आतापर्यंत काय-काय घडलं? 



  • 26 जून : अपात्रतेच्या नोटिशीला शिंदे गटाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

  • 27 जून : बंडखोर आमदारांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

  • 29 जून : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

  • 30 जून : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शपथ, शिंदे यांची निवड आणि विधानसभा अध्यक्ष निवडीला शिवसेनेचं आव्हान

  • 11 जुलै : सुनावणी टळली, प्रकरण 'जैसे थेच'

  • 20 जुलै : प्रकरण घटनापीठाकडे  सोपवण्याचे संकेत देत सुनावणी पार पडली

  • 31 जुलै : सुनावणी पुन्हा लांबणीवर

  • 3 ऑगस्ट : न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद

  • 23 ऑगस्ट : प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं 


दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. त्यानंतर 4 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 22 ऑगस्ट रोजी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला घटनापीठाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार आणि काय घडामोडी घडणार? हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Political Crisis : नबाम रेबिया केसच्या निकालामध्ये प्रथमदर्शनी विरोधाभास, या 11 मुद्द्यांवर होणार निवाडा