Shiv sena on chandrakant patil : कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत (Kolhapur By Election) भाजपचा पराभव करत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांच्या एका जुन्या वक्तव्यावरुन टीका होत आहे. कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाल्यास हिमालयामध्ये निघून जाण्याचं  वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर शिवसेनेनं सामनाच्या संपादकीय म्हणून पुन्हा निशाणा साधला आहे. सामनाच्या लेखात म्हटलं आहे की, या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील, असं लेखात म्हटलं आहे. 


लेखात म्हटलं आहे की, चार राज्यांतील पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे. याचा अर्थ भाजपा विरोधकांना अभूतपूर्व यश मिळाले असा होत नाही. या पोटनिवडणुकांच्या निकालाचे महत्त्व इतकेच की, भाजपा व त्यांचे भाडोत्री बगलबच्चे देशभरात धार्मिक द्वेषाचा विषाणू पसरवत असताना, निवडणुका लढविण्यासाठी व जिंकण्यासाठी जातीय, धार्मिक हिंसेचे वणवे पेटवीत असताना चार राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपाचा पराभव झाला आहे. पोटनिवडणुकांचे मतदान सुरू असतानाच हनुमान चालिसा, मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा, रामनवमीच्या यात्रा असे विषय तयार करून दंगलीच्या ठिणग्या टाकल्या गेल्या. त्या पार्श्वभूमीवर प. बंगाल, छत्तीसगढ, बिहार आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुका भाजपा विरोधकांनी जिंकल्या आहेत, असं सामनामध्ये म्हटलं आहे. 


लेखामध्ये म्हटलं आहे की, कोल्हापूर उत्तरेत विजयासाठी भाजपाने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी मोठी यंत्रणा कामास लावली, मोठ्या प्रमाणात पैसाअडका खर्च केला. मतदारांना पैशांचे वाटप करताना भाजपाचे लोक रंगेहाथ पकडले गेले. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून बसले. याचदरम्यान ‘मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा’सारखे विषय तापविण्यात आले. या सगळ्यांचा परिणाम कोल्हापूरच्या मतदारांवर झाला नाही व तेथे काँग्रेसच्या जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जिंकून आल्या, असंही लेखात म्हटलं आहे. 


कोल्हापूरची ही जागा परंपरेने शिवसेनेची. म्हणजे हिंदुत्ववादी विचारांची पाठराखण करणारा हा मतदारसंघ. एखाददुसरा अपवाद वगळता येथे शिवसेनेचेच शिलेदार विजयी झाले. 2019 साली अटीतटीच्या लढतीत ही जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे गेली. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही जागा पुन्हा शिवसेनेला मिळावी अशी मागणी होती. तरीही जयश्री जाधवांच्या प्रचार कामात शिवसैनिकांनी झोकून दिले. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपाचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे..


लेखात म्हटलं आहे की, 'चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय की, सत्यजित कदम उभे राहिले तर महाविकास आघाडीला हा असा घाम फुटला. प्रत्यक्ष मी उभा राहिलो असतो तर काय झाले असते त्याचा विचार करा.' पाटील यांचे बोलणे गांभीर्याने घ्यावे असे नाही. ते काही लोकनेते नाहीत व कोल्हापूरच्या राजकीय परंपरेचा वारसा काय आहे याविषयी त्यांना ज्ञान नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करण्यासाठी ते बराच काळ महाराष्ट्राबाहेर होते. त्यांनी गुजरात राज्यात काम केल्याने त्यांची सध्याच्या भाजपा धुरिणांशी जवळीक झाली व त्याच नात्याने त्यांच्या हाती महसूलमंत्री पदाचे कलिंगड लागले हेच सत्य आहे. मागच्या निवडणुकीत पाटील कोल्हापुरातून कोथरूडला गेले व निवडून आले. तेथेही निवडून येताना त्यांना काय घाम फुटला होता ते महाराष्ट्राने पाहिले. म्हणजे पाटील आता त्या अर्थाने कोल्हापूरचे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते निवडणुकीस उभे राहिले असते तर वेगळे चित्र दिसले असते या बेडक्या फुगविण्यात अर्थ नाही. पाटील उभे राहिले असते तर काय सांगावे, जयश्री जाधवांच्या मतांचा आकडा लाखावरही गेला असता, असा टोला लेखात चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.