मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2020 मध्ये राष्ट्रपती करण्याचा चंग शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बांधला आहे. यासंदर्भात संजय राऊत भाजपविरोधी आघाडीमधील विविध राज्यांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. 2022 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असेल, असा विश्वास संजय राऊत यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. त्यामुळे शरद पवार देशाचे पुढचे राष्ट्रपती होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.


आगामी राष्ट्रपती निवडणुकीत बिगरभाजप पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे शरद पवार असावेत, अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीबाबद संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेणार आहेत.


"आम्ही यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा याबाबत शरद पवार यांच्याशी बोलून त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यात काही अडचण असेल असं मला वाटत नाही. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. तसंच ज्येष्ठ राजकारणी म्हणून सन्मान केला जातो. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय बुद्धीमत्ता पाहता ते भारताच्या घटनात्मक प्रमुख म्हणून पात्र आहेत. महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे," असं संजय राऊत यांनी सांगितलं.


भाजपने दिलेले शब्द पाळला नाही, असा आरोप करत शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भजपसोबतची युती तोडली. त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या मदतीने महाराष्ट्र विकास आघाडीचा पाया रचला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची समजूत घातली. त्यांच्या पुढाकाराने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान केल्यानंतर, आता देशाच्या सर्वोच्च पदावर शरद पवार यांना बसवणं हे संजय राऊत यांचं पुढील लक्ष्य असल्याचं म्हटलं जात आहे.


कशी असते राष्ट्रपती निवडणूक?
राष्ट्रपती निवडणुकीत जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी मतदान करु शकतात. लोकसभा, राज्यसभेतील खासदार, 31 राज्यातील विधानसभेचे आमदार मतदार असतात. विधानसभांचे 4120 आमदार तसंच लोकसभेचे 543 आणि राज्यसभेचे 233 असे 766 खासदार, एकूण 4896 मतदार असतात.

2017 साली काय झालं होतं?
2017 साली एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीरा कुमार यांच्यात लढत झाली होती. 768 खासदार आणि 4083 आमदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 747 खासदार आणि 4027 आमदारांची मते वैध ठरली होती. त्यांचं मतमूल्य 10 लाख 69 हजार 358 होतं. रामनाथ कोविंद यांना खासदारांची 522 तर मीरा कुमार यांना 225 मतं पडली होती. कोविंद यांना एकूण 2930 मतं पडली ज्यांचं मूल्य 7 लाख 2 हजार 44 मूल्य होतं तर मीरा कुमार यांना 1844 मतं पडली ज्यांचं मूल्य 3 लाख 67 हजार 314 होतं. तब्बल 65.65 टक्के मतं मिळवत रामनाथ कोविंद राष्ट्रपती बनले. थोडक्यात 3 लाख 34 हजार 314 मतांनी त्यांचा विजय झाला.

महाराष्ट्रातून किती मते?
रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्र विधानसभेतून 208, तर मीराकुमार यांना 77 मते मिळाली. कोविंद यांना भाजपची 122, शिवसेनेची 63 अशी 185 मते तसंच सात अपक्ष अशी 192 मते मिळणं अपेक्षित असताना कोविंद यांना 208 मते मिळाली. त्यामुळे या 192 मतांबरोबर कोविंद यांना आणखी 16 मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य विरोधकांची मिळाली होती. थोडक्यात 16 मतं फोडण्यात देवेंद्र फडणवीस/भाजप सरकार यशस्वी ठरलं होतं.

बदलतं चित्र
दोन वर्षांपूर्वी रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाले तेव्हा चित्र वेगळं होतं. देशातील बहुतांश राज्यात भाजपची किंवा एनडीएची सत्ता होती. कोविंद यांना तब्बल 40 पक्षांचा पाठिंबा होता तर मीराकुमार यांना 17 पक्षांचा त्यामुळे एनडीएचा उमेदवार सहज विजयी होणार हे आधीपासून स्पष्ट होतं. आता हे चित्र बदललं आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राजकीय आणि भौगौलिकदृष्ट्या मोठ्या राज्यात भाजपने सत्ता गमावली आहे. त्यामुळेच बिगरभाजप पक्ष एकत्र आले तर भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं.