Sharad Pawar : तुम्ही माझं काय बघितलंय?  मी अजूनही म्हातारा झालेलो नाही. अजूनही लय भारी लोकांना सरळ करु शकतो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. त्यामुळं पवारांचा रोख पक्षात बंडखोरी केलेल्या नेत्यांकडे आहे का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'साहेब केसरी' बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार बोलत होते.


शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकारनं संकट वाढवण्याच्या गोष्टी केल्या


शेती संपन्न झाली पण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्यांना बळीराजा बद्दल प्रेम नाही.  मोठ्या कष्टानं शेतकऱ्यांनी कांदा पिकवला मात्र, त्याला चांगला दर नाही. चांगला दर मिळत असताना कांद्यावर निर्यातबंदी लावली. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकारनं संकट वाढवण्याच्या गोष्टी केल्याचे शरद पवार म्हणाले. साखर कारखानदारी महाराष्ट्रातील महत्वाची कारखानदारी आहे. साखर निर्यातीवर बंदी घातली. शेतकरी संकटात जाईल कसा याचं काम राज्यकर्ते करत असल्याचे पवार म्हणावे लागेल. 


एकजुटीच्या बळावर महाराष्ट्राचं चित्र बदलू


आपल्याला पुढच्या काळात एकजूट उभा करावी लागेल. मी तुम्हाला खात्री देतो की, एकजुटीच्या बळावर  सबंध महाराष्ट्राचं चित्र बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. पण माझी एक तक्रार आहे. सगळेजण म्हणतात तुम्ही 83 वर्षांचे झाले 84 वर्षांचे झाले, पण मी म्हातारा झालो नाही. आणखी लय भारी लोकांना सरळ करण्याची ताकद माझ्यात असल्याचे शरद पवार म्हणाले. 


पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील 'मी सेवेकरी सोशल फाउंडेशन'चे अध्यक्ष सुधीर विठ्ठल मुंगसे यांनी शरद पवार यांच्वाया ढदिवसानिमित्त केळगांव- चऱ्होली (खुर्द) येथे दिनांक 13 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान 'साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचे' आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीच्या अंतिम लढती पाहण्यासाठी शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह माजी आमदार विलास लांडे तसेच शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने ग्रामीण अर्थव्यवस्थेला संजीवनी देणाऱ्या आणि ग्रामीण संस्कृतीचे भूषण असणाऱ्या स्पर्धा पुन्हा सुरु झाल्याचा विशेष आनंद झाल्याचे शरद पवार म्हणाले.


Sharad Pawar : तरुणांनी मांडलेल्या प्रश्नाची दखल घेतली नाही तर ते आपली शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाहीत; शरद पवारांचा इशारा