Sharad Pawar : सत्तेत असलेल्यांनी जे करायला हवे ते केले नाही, त्यामुळं जनतेनं  त्यांना त्यांची जागा दाखवल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये बहिणींसाठी आणि त्यांच्या सन्माननासाठी लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana) आणली जाते. पण स्त्रियांना 50 टक्के आरक्षण आम्ही दिल्याचे शरद पवार म्हणाले. त्यामुळं स्त्री सरपंचपदापासून अनेक पदावर गेल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली? असा सवाल करत पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. 


स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर तो टिकाऊ असला पाहिजे


स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर तो टिकाऊ असला पाहिजे असंही पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेमधून पैसे देतात, त्यावर मी बोलणार नाही. पण आज कुठे ना कुठं स्त्रीयांवर अत्याचार होतात असे पवार म्हणाले. आज इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा पार पाडली, यावेळी पवार बोलत होते. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा ही ऐतिहासिक असल्याचे पवार म्हणाले. सत्ता असलेल्यांना महाराष्ट्र हिताची जपणूक करता येत नाही, त्यामुळं महाराष्ट्र मागे जातोय असंही ते म्हणाले. 


जयंत पाटलांचा मतदारसंघ आता जनतेने सांभाळावा


लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली? राज्यात बहिणीला सन्मान देण्यासाठी योजना आणली? असा सवाल करत शरद पवारांनी महायुतीला टोला लगावला. स्त्रियांचा सन्मान करायचा असेल तर तो कायमस्वरूपी टिकायला हवा असेही पवार म्हणाले.  महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र कसा असेल हे यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले होते. तसा महाराष्ट्र  घडवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. तसाच महाराष्ट्र आम्हाला बघायचा आहे. महाराष्ट्र पुन्हा नव्याने घडवायचा आहे असेही शरद पवार म्हणाले.  जयंत पाटील यांच्या उमेदवारीची  जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यावी. त्यांना आता महाराष्ट्रात दौरे करायचे आहेत. त्यामुळं त्यांचा मतदारसंघ आता जनतेने सांभाळावा असं आवाहन पवार यांनी केलं. उद्याचा प्रगतशील महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात वाळवा मतदारसंघातून होणार असल्याचे शरद पवार म्हणाले. 


गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची आज सांगता


गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज इस्लामपूरमध्ये पोहोचली. या यात्रेची सांगता सभा इस्लामपुरामध्ये पार पडली. इस्लामपूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. बालेकिल्ल्यात शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा होणार असल्याने आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा घोषित झाल्याने या सभेला महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र, या सभेपूर्वीच जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र शरद पवार आणि पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगला दुणावला.


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar NCP : इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी