कोल्हापूर  : राजर्षि शाहू महाराजांचा वारसा हा छत्रपतींच्या रक्तातच आहे, हे आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) छत्रपतींच्या एका कृतीने अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय. विशाळगड (vishalgad) अतिक्रमण मोहिमेतून झालेल्या हिंसाचारावर परखड भूमिका घेत स्वत:च्या पुत्राचा, संभाजीराजे (Sambhajiraje) छत्रपतींचा जाहीर निषेध नोंदवत शाहू महाराज छत्रपतींनी सर्वांची मनं जिंकली होती. त्यानंतर, आज विशाळगडावरील भेटीदरम्यान, भरपावसात (Rain) भिजत असलेल्या चिमुकलीला पाहून आपल्या अंगावरील जॅकेट शाहू छत्रपतींनी काढून त्या चिमुकलीच्या अंगावर घातलं, महाराजांनी मायेची ऊब त्या चिमुकलीला दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर, महाराजांच्या या कृतीने उपस्थितांनाही गहिवरुन आलं.  


माझा राजा रं.. माझा शिवबा रं... असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची, रयतेच्या राजाची महती गाण्यात आलीय. तर, आरक्षणाच्या माध्यमातून समाजातून दूर फेकलेल्या आणि वंचितांना आपलसं करुन राजर्षि शाहू महारांजांनी समानतेचा इतिहास रचलाय. राजा हा अवघ्या रयतेचाच असल्याचं शाहू महाराजांनी जगाला दाखवून दिलं. त्याच, राजर्षि शाहू महाराजांचा वारसा चालवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या कृतीने अनेकांना राजर्षि शाहू महाराजांची आठवण झाली. कारण, विशाळगडावरील पाहणीदरम्यान गजापूर या ठिकाणी गेल्यानंतर शाहू महाराजांनी स्वतःच्या अंगावरील जॅकेट काढून चिमुकलीच्या अंगावर चढवले,  जोरदार वारा आणि पाऊस पडत असताना गजापुरातील महिला, चिमुकली मुलं शाहू महाराजांना भेटून कालची घटना सांगत होते. त्यावेळी, पावसात भिजणारी आणि कुडकुडणारी चिमकुली पाहून महाराजांनी नकळत आपल्या अंगावरील जॅकेट काढले अन् चिमुकलीला मायेची उब म्हणून परिधान केले. शाहू महाराजांच्या या कृतीने उपस्थितही गहिवरल्याचं पाहायला मिळालं. 


विशाळगडावर भेट देऊन केली पाहणी  


विशाळगड परिसरातील जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील  राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची पाहणी केली होती. या भेटीत शाहू महाराजांनी विशाळगडावरील मुस्लीम बांधवांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले. शाहू महाराजांनी आज विशाळगडाला भेट दिल्याचं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही सांगितलं आहे. किल्ले विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त गजापूर गावास भेट देऊन पाहणी केली. किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात घडलेली हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून धर्मांधतेच्या राजकारणापासून दूर राहून कोल्हापूरकर बंधुत्वाची भावना जोपासत संपूर्ण देशासमोर अनुकरणीय आदर्श ठेवतील याची खात्री आहे, असे शाहू महाराजांनी म्हटलं आहे.