नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी, तसेच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार स्थापन करता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. ही बैठक सुरु असतानाच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच सरकार येणार असल्याचे सांगितले.


आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर माध्यमांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बातचित केली. यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की, सत्तास्थापनेसाठी आघाडीच्या नेत्यांमधील चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या चर्चेनंतर लवकरच तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरेल. तसेच लवकरच राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री या सरकारचं नेतृत्व करेल.

संजय राऊत म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार बनावं, यासाठी अनुकूल आहेत. राज्याच्या हितासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं, यासाठी सोनिया गांधींनी पाठिंबा दिला आहे.

राऊत म्हणाले की, सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, तीन पक्षांचं सरकार येणार आहे. या सरकारला सत्तास्थापन करण्यासाठी एक किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल. त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या मार्गातून आपल्याला पुढे जायचं आहे? यासाठी तयारी करावी लागेल. ती तयारी उरलेली आहे. त्यासाठी आघाडीची सध्या खलबतं सुरु आहेत.

दरम्यान, राऊत यांनी सांगितले की, आजच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत काय झालं? याबाबतची माहिती घेण्यासाठी मला शरद पवारांची भेट घ्यावी लागेल, ती माहिती मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना द्यावी लागेल. त्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने पुढची पावलं पडतील. परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की, ही प्रक्रिया फार लांबणार नाही.

यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री शपथ घेईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्र हाती घ्यावी, अशी माझी आणि राज्यातल्या जनतेची इच्छा आहे. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंशिवाय कोणताही पर्याय नाही.

पाहा काय म्हणाले संजय राऊत?



ठरलं! राज्यात महाशिवआघाडीचंच सरकार येणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची माहिती | ABP Majha