सांगली : कोरोनाची दुसरी लाट येणार हे माहीत असून देखील राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत काहीच उपाययोजना केल्या नाहीत, अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर सांगली जिल्हा कोरोना रुग्णांची स्मशानभूमी होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.


सांगलीतील कोरोनाची परिस्थिती प्रशासनाच्या हाताच्या बाहेर  गेली आहे. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून जिल्ह्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे याची देणार असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.


रेमडेसिवीर मिळाले नाही तर कोरोनाबाधितांसह मातोश्रीवर ठाण मांडू, सदाभाऊ खोत यांचा राज्य सरकारला इशारा


सरकारने जनतेला देवाच्या भरवशावर सोडून दिले आहे. सरकार सर्वच ठिकाणी ठोकशाही पद्धतीने काम करत असून दादागिरी करून काम करत आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे सरकार विसरून गेलेले आहे. तुम्ही गुंड, ठग म्हणून सत्तेवर  बसला नाहीत तर सेवक म्हणून बसला आहात याची जाणीव ठेवा असेही खोत म्हणालेत. 


सांगली जिल्हा कोरोना रुग्णाची स्मशानभूमी होण्याची भीती


सांगली जिल्हा कोरोना रुग्णाची स्मशानभूमी होतो का काय अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालीय. सांगली जिल्ह्यातील कोरोनाच्या उपाययोजना बाबतीत परिस्थिती प्रशासनाच्या हाताच्या बाहेर  गेली आहे. जिल्ह्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवणार आहे. एकीकडे रेमडीसीविर मिळत नाहीत तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा  निर्माण झालाय. प्रशासन मात्र यामध्ये सरकारची आणि जनतेची देखील दिशाभूल करत आहे.


सांगली जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची आणीबाणी आहे. ऑक्सिजन पूर्ण संपल्याने काही हॉस्पिटलमधील रुग्ण माझ्या डोळ्यासमोर दगावले आहेत. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज असते पण व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. मात्र काही मंत्री जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा असल्याचे सांगत आहेत. मग दररोज 50-50 लोक मृत्यूमुखी कशाने पडत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल देखील खोत यांनी विचारला. त्यामुळे मंत्र्यांनी आता हवेत गोळीबार न करता, हवेत न बोलता जमिनीवर येऊन रुग्णालयांना भेटी दिल्यास सत्य परिस्थिती काय आहे हे कळेल असेही खोत म्हणाले. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लँट उभारा हे आम्ही सहा महिन्यापूर्वीच सांगून देखील प्रशासनाने काही पाऊले याबाबतीत उचलले नाहीत. आज पालकमंत्री प्रत्येक तालुक्यात बैठका घेत आहेत. नुसत्या बैठका घेण्याऐवजी प्रत्येक तालुक्यात रेमडीसीविर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा मिळवून द्या, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना केलं आहे.