Samruddhi Mahamarg Thane Accident : समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर (Thane) येथे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच इंजिनियरसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.


समृद्धी महामार्ग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर


पहाटेपर्यंत 17 जणांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर गर्डरखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. तर काही गंभीर जखमींना शहापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गर्डरखाली दोन मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. एनडीआरएफचे अधिकारी सारंग कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून सांगितल्याप्रमाणे 28 जणं इथे उपस्थित होते. त्यापैकी 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे.


गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब कोसळून अपघात


शाहपूर सरलांबे येथे गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळून हा भीषण अपघात घडला. या अपघातात इंजिनिअर आणि मजूरांना जीव गमवावा लागला आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु असताना सोमवारी रात्रीच्या वेळी ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे. 


गर्डर कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल


नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लाँच करणाऱ्या व्ही एस एल कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 304 अ, 337, 338 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळं कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी असलेल्या प्रेम प्रकाश साव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पालकमंत्री शंभुराजे देसाई काय म्हणाले?


पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शंभुराजे देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी असून त्यांची तब्येत स्थिर आहे, त्यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी शासनाकडून हलवले जाईल. अपघाताचे कारण नेमकं काय हे चौकशीनंतर कळेल. 20 मृतदेहांच्या कागदपत्रांची पुर्तता करत आम्ही पाठवण्याचे बंदोबस्त करत आहोत. चौकशीत प्राथमिक गोष्टी समोर येत नाही तोपर्यंत हे का घडलं हे सांगणं कठीण आहे.