Samruddhi Highway: समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) वापर सुरू झाल्यानंतर वाहनांच्या वाढत्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात होती. या अपघातांच्या वाढत्या संख्येवर पायबंद घालण्याची मागणी करण्यात येत होती. प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी वेग मर्यादेसह इतर नियम लागू केले आहेत. आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना कार चालकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अति वापर झाल्याने घासलेल्या टायरसह समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर आरटीओने (RTO) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आरटीओने तीन वाहनांवर 20 हजार रुपयांचा दंड (RTO Fine) ठोठावला आहे. 


समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) सरसावले आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या प्राणांतिक अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातांवर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यातच घासलेल्या टायरमुळे अपघात होण्याचे प्रमाण असल्याचे दिसून आढळून आले आहे. त्यानंतर आरटीओने घासलेले टायर असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत 'Tred  depth Analyzer' च्या साह्याने टायरची तपासणी सुरू आहे. यातील तीन वाहनांचे टायर जास्त घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावर आढळून आले. या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करीत प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 


समृद्धी महामार्गांवर ट्रकला कारची मागून धडक, तिघांचा जागीच मृत्यू


काही दिवसांपूर्वीच वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारनं मागून धडक दिल्याची घटना घडली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच 2 एप्रिल रोजी, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारनं मागून धडक दिल्याची घटना घडली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री साडेबारा वाजता घडला. डॉक्टर ज्योती क्षीरसागर (रा. मालेगाव, जिल्हा -वाशीम), डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (राहणार, अमरावती), भरत क्षीरसागर (रा. मालेगाव, जिल्हा -वाशीम) अशी मृतांची नावं आहेत. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहेत. नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गानं जात असताना ज्योती क्षीरसागर हिचं कारवरील नियंत्रण सुटलं. भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.


अपघाताची मालिका सुरूच


समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून त्यावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहेत. अनेकदा गाडीचे टायर फुटल्याने देखील अपघात होत आहे. तर या महामार्गावर अचानक जनावरे समोर आल्याने त्यांना वाचवण्याच्या नादात देखील अपघात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) लोकार्पण करण्यात आले. मात्र हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करताच यावरील होणाऱ्या अपघाताची (Accident) मालिका चर्चेचा विषय बनला आहे.