मुंबई :  महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)  यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे.  येत्या 22  तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपणार होता मात्र तत्पूर्वीच आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा रुपाली चाकणकर यांच्याकडे सोपवण्यात आली. चाकणकर यांच्या नियुक्तीचं गॅझेट नुकतच प्रसिद्ध करण्यात आलं.


 राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी  सात आमदारांचा काल शपथविधी पार पडला.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही विधान परिषदेची आमदारकी मिळणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध झाला. एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी विचारला होता. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत चाकणकर यांचं नाव  नव्हते. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. चाकणकर यांचा कार्यकाळ 22 ऑक्टोबरला संपणार आहे.


कोण आहेत रुपाली चाकणकर? 


नगरसेविका ते  महिला आयोगाच्या अध्यक्षा असा रुपाली चाकणकरांचा  प्रवास आहे.   दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला.    रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.  आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.


महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती?


महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारं राज्य महिला आयोग एक मंडळ आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. महिला आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची निवड राज्य सरकारकडून होते.   


महिला आयोगाची स्थापना का झाली?


1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1993 मध्ये महाराष्ट्रातही महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, महिलांची समाजातली स्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करतं.