Akola Vidhan Sabha Election : अकोला : विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानं राज्यातील राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. मात्र, जागा वाटप झाल्याचा दावा करणाऱ्या महायुतीत अनेक मतदारसंघावरून घमासान होण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या (BJP) ताब्यात असलेल्या अकोला (Akola District) जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून माहितीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्यक्त केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांनीही अकोटमधून (Akot) उमेदवारीसाठी शड्डू ठोकलाय. मिटकरी आणि बाजोरियांनी या मतदारसंघात भाजपच्या आमदाराविषयी नाराजी असल्याचा दावा केला आहे.                   

  


अकोट... अकोला जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ. भाजपचे प्रकाश भारसाकळे 2014 पासून सलग दोनदा येथून विजयी झाले आहेत. मात्र, भाजपच्या ताब्यातील याच मतदारसंघावर महायुतीत भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फायरब्रँड आमदार अमोल मिटकरींनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मिटकरी अकोट तालुक्यातील कुटासा गावचे रहिवाशी आहेत.      


अकोट मतदार संघावर शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अकोट मतदार संघात कामालाही सुरुवात केली आहे. गोपीकिशन बाजोरिया शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते असून ते सलग तीन टर्म विधान परिषदेचे आमदार होते. 2021 मध्ये अकोला स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी पराभव केला होता. तेव्हापासून बाजोरिया नवीन संधीच्या शोधात आहेय. सलग तीन वेळा मागच्या दाराने विधिमंडळात गेलेल्या बाजोरिया यांना यावेळी जनतेतून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे.             


महायुतीतील दोन्ही मित्रपक्ष भाजपच्या या मतदारसंघावर दावा करीत असले तरी आमदार प्रकाश भारसाकळे मात्र निर्धास्त आहेत. त्यांनी मिटकरी आणि बाजोरियांच्या दावेदारीकडे फारसं गांभिर्याने घेतलेलं नाही. पक्ष तिसऱ्यांदाही आपल्यालाच उमेदवारी देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


दरम्यान, अकोटच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा मोठे नेते चर्चेतून सोडवतीलही. मात्र, तिन्ही पक्षातील नेत्यांच्या दुभंगलेल्या मनाचं कार्यकर्त्यांत उमटणारं प्रतिबिंब पुढच्या काळात कोणतं रूप घेतंय? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.