Rohit Pawar on Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावाच लागेल. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही. महाराष्ट्राने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे काम पाहिले. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जे यश मिळालं त्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री केलेल्या नेतृत्वाचा परिणाम आहे.महाविकास आघाडी एकत्र असेल तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पाहावा लागेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना संजय राऊतांना सुनावले आहे.  


लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीने विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता राऊतांच्या मागणीवर रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.   


ही लढाई मुख्यमंत्रिपदाची नाही तर...


महाविकास आघाडी झाली तेव्हा कोणालाच माहिती नव्हते. ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही तर सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. पदापेक्षा विचारांसाठी लढायला हवे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी संजय राऊत यांच्या मागणीवर दिली आहे. आता मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


ड्रग्स मुबलक मिळतात, मात्र खतासाठी वणवण फिरावं लागतंय


पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर रोहित पवार म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. पुण्यात देखील निवडणुकीमध्ये गुंडांचा वापर केला गेला.  गुंडांना आता वाटतंय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला भेटतात. बिल्डर शेतकऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून जमिनी घेत असतील तर ते योग्य नाही. राज्यात ड्रग्स मोफत मिळतात.  ड्रग्स मुबलक मिळतात मात्र खतासाठी वणवण फिरावे लागत आहे.  देवेंद्र फडणवीस यांना मला सांगायचं आहे की, नरेटीव्ह कोण सेट करत आहे. साडेपाचशे कोटी सोशल मीडियाला दिले त्याचं केलं काय याचे उत्तर भाजपने द्यायला हवं.  राज्यात खोटा नरेटीव्ह सेट करण्यासाठी साडेपाचशे कोटीचा वापर केला आहे. आता भाजपचेच लोक म्हणत आहेत.  खोटं बोल पण रेटून बोल असं देवेंद्र फडणवीस करतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही, असा टोला रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा; संजय राऊत यांची अप्रत्यक्ष मागणी