मुंबई : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांचं मुंबईच निधन झालं. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी - परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली होती. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला होता. डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी प्राप्त होती.


2 नोव्हेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरागड येथे अंत्यसंस्कार
डॉ. रामराव बापू महाराजांवर 1 नोव्हेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरागड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येण्याची शक्यता आहे.  मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी गर्दी करू नये असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. रामराव महाराज यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत मुंबई वरून पोहरागड येथे येईल. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली माहिती दिली.


कोण होते राष्ट्रीय संत डॉ रामरामबापू महाराज
गोर बंजारा समाज बांधवांचे धर्मगुरू राष्ट्रीय संत डॉ रामरावबापू महाराज यांचा जन्म श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील रामावत परिवारात झाला.  बालपणीच वडील परसराम महाराज वैकुंठवासी झाल्याने वयाच्या 12 व्या वर्षी बापूंना परिसरातील 51 तांडयातील नायकांनी गादीवर बसविले. बापू यांनी तेव्हापासून अन्नत्याग करून जगदंबादेवी मंदिरात 12 वर्ष अग्नी अनुष्ठान लावून तपश्चर्या केली. त्यानंतर 12 वर्ष मौनधारण व्रत पूर्ण केल्यानंतर बापू देश भ्रमणाकरिता बाहेर पडले. यावेळी बापू तांड्यात जायचे. तेव्हा समाजातील नागरिक व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसल्यानंतर त्यांनी अनेक भक्तांची व्यसनं सोडवून चांगल्या मार्गावर आणले. देशातील अनेक प्रांतात बापूंचे बंजारा समाजाव्यतिरिक्तही भक्त आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान ,धर्मगुरू डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनाने खूप दुःख झाले. डॉ. रामरावजी महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातील अनिष्ट प्रथांवर नेहमीच  प्रहार केला आणि जनजागृतीचे मोठे कार्य केले. श्री पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा, तसेच राज्यातील तांड्याच्या विकासासाठी व्हावा, यासाठी ते आग्रही होते.त्यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. व्यसनापासून दूर राहावे, शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. श्रद्धास्थान, धर्मगुरु म्हणून त्यांचा अनुयायांना मोठा आधार होता. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मासह, समाज सुधारणेच्या क्षेत्रातील मार्गदर्शक छत्र हरपले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर  चालत राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. डॉ. रामरावजी महाराज यांना त्रिवार वंदन.



बापूंच्या आठवणींना मुंडेंनी दिला उजाळा
संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे; अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंडे यांनी डॉ. रामराव बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराजांना वाशीम येथील पोहरादेवी तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचे सान्निध्य लाभले हे माझे भाग्यच म्हणावे लागेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. नुकतेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना धनंजय मुंडे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.  दरम्यान डॉ. रामराव बापू महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, महाराजांचे बंजारा समाज व्हीजेएनटी आरक्षण लढ्यातील योगदान, त्यांचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहील तसेच पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.