Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस. सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी तुपकरांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अन्नत्याग आंदोलनामुळे काल तुपकर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. 


रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला रात्री पुन्हा हिंसक वळण लागलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा तहसीलदार यांची गाडी पेटवली. तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते संतापल्याचं पाहायला मिळालं. 


17 नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला काल (शुक्रवारी) संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्यागाचा आज चौथा दिवस असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्यानं कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्यानं आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच गदारोळ उडाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली. दरम्यान पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या. तारांबळ उडालेल्या प्रशासनानं सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळलं. परंतु सद्यस्थितीत तुपकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने तुपकरांच्या घरासमोर जमत आहे. सध्या तुपकरांच्या घरासमोर तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, रात्री उशिरा बुलढाणा तहसीलदार यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न काही आंदोलकांनी केल्यामुळे आज अजूनही पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आज हे आंदोलन अजूनही तीव्र होण्याची शक्यता आहे. 


माझा मुलगा शेतकऱ्यांसाठी लढतोय, त्याचं काही बरं वाईट झाल्यास सरकारच जबाबदार; रविकांत तुपकरांच्या मातोश्रींना अश्रू अनावर


रविकार तुपकर यांच्या मातोश्रींनी एबीपी माझाशी बोलताना आर्त टाहो फोडलाय. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्या म्हणाल्या की, माझा मुलगा शेतकऱ्यांसाठी लढतोय. शेवटी शेतकऱ्यांचा मुलगा आहे तो. गुंडगिरी नाही करत. आम्ही कोणता गुन्हा नाही केला. आम्ही स्वतः शेतकरी आहोत. सर्व शेतकऱ्यांसाठी त्यानं आंदोलन केलंय. तो त्याच्या मालाला तो भाव मागतो. सर्व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तो स्वतःचा जीव त्याग करण्यासाठीही तयार आहे. याची दखल सरकारनं घ्यायला पाहिजे. त्याच्या जीवाला काही बरंवाईट झालं तर त्याला फक्त आणि फक्त सरकारच जबाबदार असेल. 


रविकांत तुपकरांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी माराठवाडा , खान्देशातून कार्यकर्ते बुलडाण्यात


गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कापूस, सोयाबीन आंदोलनाला आता वाढता पाठिंबा पाहायला मिळत आहे. रविकांत तुपकर यांनी बुलडाण्याच्या त्यांच्या निवासस्थानी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला काल हिंसक वळण बघायला मिळालं. दरम्यान तुपकरांची तब्येत ढासळत असल्यानं कार्यकर्त्यांची आता चिंता वाढू लागली आहे. दरम्यान चार दिवस होऊनही सरकारनं या आंदोलनाची दखल न घेतल्याने आज हे आंदोलन कुठलं वळण घेत घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :