Ratnagiri News Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात झाले आहेत. (Accident at Mumbai Goa Highway) रत्नागिरी जिल्ह्यातील भरणे गोवळवाडी याठिकाणी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले असून त्यातील दहा जण गंभीर असल्याची माहिती आहे. तर दुसरा अपघात कळंबणी वळंजवाडी या ठिकाणी झाला आहे. तवेरा गाडी महामार्गालगत खड्ड्यात पडून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. 


दोन्ही अपघातामध्ये एकूण 37 प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील पंधराहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही अपघात पहाटे सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाले. 


दोन्ही अपघातांमधील सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनांची माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांची धाव घेतली. तसेच खेडमधील मदत ग्रुप आणि रेस्क्यू टीमचे जवानही घटनास्थळी मदतीला दाखल झाले. 


पहिल्या घटनेत परळहून खेड तालुक्यातील केळणे या गावात लग्नासाठी जात असताना खासगी आराम बस भरणे गोवळवाडी या ठिकाणी महामार्गाच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यात 30 प्रवासी जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या अपघातात मुंबईहून जयगडला जाणाऱ्या तवेरा गाडीचा देखील भरणे वळंजवाडी या ठिकाणी अशाच प्रकारे  महामार्गलगत खड्ड्यात पडून अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.


खासगी लक्झरी बस मधील 30 प्रवासी जखमी असून त्यामध्ये दहा जण गंभीर जखमी आहेत तर तवेरा गाडी मधील सात जण गंभीर जखमी आहेत. या दोन्ही अपघातांनी परिसरात खळबळ उडाली असून एकाच वेळी दोन मोठे अपघात घडल्यानं प्रशासनाची देखील धावपळ झाली.