नाशिक/पंढरपूर : होळीपौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. यानिमित्त राज्यातील अनेक भागात आज रंगोत्सव बघायला मिळाला. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायावरही रंगांची उधळण करण्यात आली. तर नाशिकमध्ये रहाडीत रंग खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे.


विशेष म्हणजे रहाडीचा रंग एवढा गडद असतो की पुढचे दोन दिवस तरी रंगाची ही लाली नाशिककरांच्या चेहऱ्यावरुन उतरत नाही. याचबरोबर सांगली, लातूर या शहरांमध्ये रंगांची उधळण करत तरुणाईने गाण्यांवर ठेका धरला.

ज्याच्या भक्तीचे, महिमेचे विविध रंग पाहायला मिळतात, त्या विठुरायाला आज रंगवलं गेलं. कारण होतं वंसतोत्सवाचं.. वसंत पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत रोज विठुरायाला पांढरा पोशाख परिधान केला जातो आणि त्यावर विविध प्रकारचे नैसर्गिक रंग उडवून त्या रंगात श्रीरंगाला रंगवलं जातं.

आज रंगपंचमीला हजारो भक्त देवाच्या अंगावर रंग उडविण्यासाठी आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.. पहाटेपासूनच पंढरपुरात रंगपंचमीच्या जल्लोषाला सुरुवात झाली. आज संध्याकाळी देवाची पूजा करुन देवाच्या रंगांचा डफ प्रदक्षिणा मार्गावरून फिरविण्यात येतो आणि त्यातला रंग आपल्या अंगावर पडावा यासाठी शेकडो भाविक या डफात सामील होतात.

रहाडीतील पारंपारिक रंगोत्सव ही कायमच नाशिकच्या रंगपंचमीची ओळख ठरते. यंदाही रहाडीची विधीवत पुजा करु देवांचा जयजयकार करत या उत्सवाला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा मानकरी रहाडीत उडी मारतात आणि त्यानंतर रहाडी ही नागरिकांसाठी खुली केली जाते.

विविध भागातल्या रहाडीचे रंगही वेगवेगळे असतात. रहाडींना पेशवे काळापासूनच महत्व असून ही परंपरा जोपासणारं नाशिक हे एकमेव शहर आहे. पेशवाईत एकूण 7 रहाडी असल्याची नोंद आहे. त्यातील तीन रहाडींमध्ये हा उत्सव साजरा होतो.