Rajya Sabha election 2022: राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी झाले. निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला असून भाजपकडून राज्यात सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे.


महाविकास आघाडीतील 3 आणि भाजपचे 3 असे उमेदवार विजयी झाले. प्रफुल्ल पटेल  (राष्ट्रवादी काँग्रेस- 43) इम्रान प्रतापगढी (काँग्रेस- 44),  संजय राऊत (शिवसेना- 42) आणि एकट्या भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल (भाजप- 48) अनिल बोंडे (भाजप- 48) धनंजय महाडिक (भाजप-42) यांनी बाजी मारली.


राज्यसभेच्या निवडणुकीत यावेळी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. निवडणुकीच्या निकालासाठी पहाट झाली. भाजपने यावेळी उत्तम कामगिरी बजावत बाजी मारल्याने पुण्यासह इतर शहरात पहाटेपासून भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.


भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यामुळे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48-48 मते मिळाली. आमच्या तिसर्‍या उमेदवाराला मते मिळाली. शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळाली, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.


फडणवीसांच्या कामाचं सर्वत्र कौतुक


या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील फडणवीसांंचं कौतुक केलंय. सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल असेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार यांनी म्हटले, अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांचंं कौतुक केलं.


महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यात प्रफुल्ल पटेल  (राष्ट्रवादी काँग्रेस- 43) इम्रान प्रतापगढी (काँग्रेस- 44),  संजय राऊत (शिवसेना- 42) यांनी विजय मिळवला. राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारसाठी आवश्यक असणारे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे हे या मतांवरून स्पष्ट दिसून येत असल्याचे पवार यांनी म्हटले.