शिर्डी : थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करणे चुकीचं असून नविन नेतृत्व तयारच होवून द्यायचं नाही, ही राज्य सरकारमधील लोकांची मानसिकता आहे. आपलीच पारंपरिक घराणी सत्तेत राहिली पाहीजे यासाठी हा निर्णय असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. आज शिर्डीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीसह जिल्हास्तरीय नवीन कार्यकारिणीची निवड पार पडली त्यावेळी ते बोलत होते.


राजू शेट्टी यांनी आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही घणाघाती टीका केली. शेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. घराणेशाहीचं समर्थन करणारं हे सरकार असून तुमचे घराणे अगोदरच आमच्या बोकांडी बसले आहेत, किमान गावातले तरी संपवू द्या, अशी टीका थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करण्यावर राजू शेट्टी यांनी केली.


पटसंख्येच्या नावाखाली राज्य सरकार शाळा बंद करायला निघालं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अती दुर्गम भागात शाळा आहेत, वाड्या-वस्त्यांवरच्या शाळा बंद झाल्या तर मुलांना पायपीट करावी लागणार असून गुलामांना जन्म घालणारी ही व्यवस्था आहे का? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला विचारला.


शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली, असं असताना हे सरकार नेमकं कुणासाठी काम करतंय? असा सवालली राजू शेट्टींनी उपस्थित केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC ला स्वाभिमानीचा विरोधच असून मुळ मुद्यांना बाजूला ठेवून हा निर्णय घेणे अयोग्य असून केंद्र सरकारची धोरणं शेतकरी विरोधी आहेत. आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून हे सरकार काय शेतकऱ्यांचं सरकार आहे का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर उपस्थित केला.


संबंधित बातम्या