Raj Thackeray on Manipur Violence: ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या दोन महिन्यांपासून रक्तपात सुरु आहे. मणिपूर शांत करण्यात सर्वच पातळीवर मोदी सरकारला आलेल्या अपयशामुळे देशभरातून सडकून टीका होत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएम मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

  


वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली, तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराच राज ठाकरे यांनी ट्वीट केलेल्या पत्रातून दिला आहे. मणिपूरमध्ये प्रामुख्याने दोन स्थानिक वांशिक समुदायांमध्ये, मेईटेई आणि कुकी यांच्यामध्ये वारंवार आंतर-जातीय संघर्ष होत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 113 जणांचा मृत्यू झाला असून तीनशे जण जायबंदी झाले आहेत.  


राज ठाकरे यांनी काय म्हटले आहे?


ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले 2 महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय हे कळत नाही. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी ईशान्य भारताकडे कॉंग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणून दूषणं द्यायचे, पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री श्री. अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल असं वाटलं होतं.


असो, मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्येकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे ते पाहून, हे सगळे प्रयत्न वाया जातील अशी भीती वाटते. वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल.


म्हणून माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा.






राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर


दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मणिपूरच्या जनतेला शांततेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हिंसाचार हा उपाय नसल्याचे त्यांनी मणिपूर दौऱ्यात सांगितले. राजधानी इंफाळमध्ये राजभवनात राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकांच्या वेदना सांगण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी मी मणिपूरला भेट दिली.


राहु म्हणाले की, एक भयानक शोकांतिका घडली आहे. मणिपूर आणि भारतातील लोकांसाठी हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. हिंसेने कुणालाही काहीही मिळणार नाही. शांतता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, मी येथे कोणतेही राजकीय वक्तव्य करण्यासाठी आलो नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या