पुणे : बदलती जीवनशैली आणि आहारामुळे शरीराशी संबंधित अनेक आजार सध्या उद्भवत आहेत. स्थूलपणा हा त्यातलाच एक. तरुणाईमध्ये दिवसेंदिवस स्थूलपणा वाढत आहे. त्यामुळे तरुणाई जिम, डाएट, शस्त्रक्रिया करुन स्थूलपणा कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या सगळ्या प्रयत्नात ते शरीराची हेळसांड करतात. असंच एक प्रकरण पुण्यात समोर आलं. स्थूलपणा कमी करण्याची थेरपी एका महिलेसाठी धोकादायक ठरली. या थेरपीमुळे महिलेची मज्जासंस्थाच बिघडली आहे.


नांदेडच्या 33 वर्षीय गौरी अत्रे नावाच्या महिलेने स्थूलपणा कमी करण्यासाठी नॅच्युरोपथीवर आधारित वजन करण्याची थेरपी घेतली. पण ह्याचा परिणाम भयावह होता. तिची मज्जासंस्था पूर्णत: बिघडली असून आता तिला चालता, बोलताही येत नाही. शिवाय बसण्यासही अडचणी येतात.

गौरी अत्रे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु आहेत. मज्जासंस्थेशिवाय त्यांना अजूनही त्रास सुरु झाले आहेत. त्यांच्या मान, हात आणि पायांवर अनेक गाठी आल्या आहेत.

गौरी अत्रेंना 26 ऑगस्ट, 2017 रोजी निसारगंजली संस्थेच्या एका क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉ.सुनील कुलकर्णी यांची ही संस्था असून, तिथे नॅच्युरोपथीच्या मदतीने स्थूलपणा कमी करण्याचा इलाज केला जातो. या संस्थेत 21 दिवस उपचार घेतल्यानंतर गौरी घरी आल्या. या ट्रीटमेंटमध्ये त्यांना काढा, एनीमा दिला जात होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने 16 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2017 या 35 दिवसात त्या औषधं आणि लिक्विड डाएट घेत होत्या.

"नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गौरीची तब्येत बिघडली. तिला दृष्टीदोष, अशक्तपणा, श्वास घेण्यात अडचणी आणि विस्मरणाच्या तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर तिला नांदेडच्या जीजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथेही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मग आम्ही तिला हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर 20 दिवस उपचार सुरु होते. डॉक्टरांनी तिच्या काही तपासण्या केल्या. तिची मज्जासंस्था बिघडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिला पूर्वीसारखं लिक्विड डाएटही घेता येत नाही. आता ती ना चालू शकत, ना बोलू शकत. फक्त रडत असते," असं गौरी अत्रेंची आई माया भास्कर म्हणाल्या.

यानंतर 23 फेब्रुवारी, 2018 रोजी गौरी यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. न्यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजस देशपांडे यांनी सांगितलं की, "बेसल गॅन्ग्लिया (एखाद्या व्यक्तीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणारा मेंदूचा केंद्रबिंदू) बिघडला आहे. अनेक कारणांनी बेसल गॅन्ग्लिया बिघडू शकतो. ऑक्सिजनचा कमी पुरवठा किंवा मेंदूला कमी रक्त पुरवठा, शरीरातील साखरेंचं प्रमाण कमी होणं, जॅपनीज बी व्हायरस यांच्यामुळे बेसल गॅन्ग्लियाला नुकसान होऊ शकतं. गौरी अत्रेना कंपन नियंत्रण औषधं दिली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे."