Pune Crime News : पुण्याच्या हडपसरमध्ये 2013 साली कोयत्याने वार (Koyta Gang) करून हत्या झालेल्या प्रकाश गोंधळे (Prakash Jondhale) प्रकरणातील हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते असलेल्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं असतं तर आज कोयता गॅंग उदयास आली नसती, अशी प्रतिक्रिया मयत प्रकाश गोंधळेचे भाऊ राजू गोंधळे यांनी दिलीये. दहा वर्षाने का होईना अखेर न्याय मिळाल्याने त्यांनी पोलीस प्रशासन आणि न्यायालयाचे आभार मानले आहेत. आरोपींना जन्मठेपेची मिळालेली शिक्षा हीच प्रकाश गोंधळेंना मिळालेली खरी श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी राजू गोंधळेंनी व्यक्त केली.


हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेडगे, राहुल कौले, विकी पाटील, सुरज फडके आणि आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांना आयपीसी कलम 302 तसेच 506(2) अंतर्गत 2 वर्षे, फौजदारी कलम 7 च्या तरतुदीनुसार 6 महिने आणि प्रत्येक आरोपीला 20 हजार रूपये दंड सुनावण्यात आला आहे. या शिवाय आरोपींनी दीड लाख रुपये प्रकाश गोंधळे यांच्या कुटुंबियांना द्यावे, असं या आदेशात सांगण्यात आलं आहे. 


10 वर्षांनी मिळाला न्याय...


10 वर्षांपूर्वीदेखील कोयता गॅंग सक्रिय होती. हे प्रकरण 2013चं आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश गोंधळेंच्या घरावर हल्ला केला होता. त्यांनी दहशत निर्माण केली होती. त्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा पेट्रोल टाकून जाळला होता आणि कुटुंबियांना त्रास दिला होता. त्यावेळी कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई तेव्हा झाली नव्हती. त्यानंतर महिन्याभरानेच रात्री गोंधळे हे घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली होती. त्यानंतर या खटल्यात विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम  यांची नियुक्ती करण्यात आली होती.


...तर आज कोयता गॅंग उदयास आली नसती



मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली आहे. त्यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी विशेष पथकदेखील नेमणार आहे. त्यांच्यामुळे अनेक व्यावसायिकांचं नुकसान झालं आहे आणि अनेक सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जर दहा वर्षापूर्वी प्रकाश गोंधळेंवरील हल्लेखोरांवर कारवाई झाली असती तर आज पुण्यात कोयता गॅंग उदयास आली नसती. 


संबंधित बातमी-


Pune Crime News : मोठी बातमी! कोयता गॅंगचा म्होरक्या अटकेत; पुणे पोलिसांची मोठी कारवाई