मुंबई : जनतेने निवडून दिलेले राजकीय नेते सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (Presidents Rule) लागू करण्यात आली आहे. राज्यावर आलेल्या या परिस्थतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षांवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राज्यपाल लागू म्हणजे महाराष्ट्राचा आणि मतदारांचा हा घोर अपमान असे त्यांनी म्हटले आहे


'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे', असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सत्तेचा दावा करणाऱ्या सर्व पक्षांना त्यांनी खास ठाकरे शैलीमध्ये फटकारले आहे.

भाजपाला सत्तास्थापनेसठी अपयश आल्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने वेळ वाढवून मागितली होती. परंतु मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यास राष्ट्रवादी असमर्थ असल्याचा निष्कर्ष काढत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यावर अखेर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.



राज्यात आतापर्यंत दोनदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याआधी 1978 साली शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींनी त्यांचं सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लावली होती आणि मध्यावधी विधानसभा निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी राज्यात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 यादरम्यान राष्ट्रपती राजवट होती. त्यानंतर 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यावेळी राज्यात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लावली होती.

President Rule Imposed in Maharashtra | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू | ABP Majha