काँग्रेसमधील धनगर समाजाचे आमदार रामहरी रुपनवर आणि राष्ट्रवादीकडे असलेले आण्णा डांगे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. धनगर समाजाला संविधानात दिल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे दाखले देण्यास फडणवीस सरकार विलंब करीत असल्याने त्यांच्यावरील नाराजी प्रकट करण्यासाठी हा मेळावा घेतल्याचे आ रुपनवर यांनी सांगितले.
या मेळाव्यास सर्व धनगर संघटना उपस्थित राहणार असल्याचा दावा करताना या मेळाव्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याना निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे 9 ऑगस्ट पासून धनगर आरक्षण समन्वय समिती पंढरपूर मध्ये पाच लाख समाज बांधवांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा या संघटनेकडून यापूर्वीच करण्यात आली आहे.