सोलापूर : साखर कारखान्यांच्या कर्जासाठी आर्थिक गळचेपी करून इतरांना पक्षात घेतले जात आहे. हे फार काळ टिकणार नाही अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते हे आपल्या संपर्कात असून ते लवकरच युतीत प्रवेश करतील असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर सुशीलकुमार शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं.


शिंदे म्हणाले की, साखर कारखानदारांची अडचण केली जात आहे. त्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून त्यांना भाजप प्रवेश दिला जात आहे. हे स्वमर्जीने जात आहेत असं नाही. त्यांच्या अडचणीमुळे काहीजण पक्षांतर करीत आहेत. पण ते जास्त काळ टिकणार नाही.' असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

चौकशीच्या भीतीने आणि सरकारची मदत व्हावी या हेतूने अनेकजण पक्ष सोडत आहेत : अजित पवार
अनेक नेत्यांच्या वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत. या चौकशीच्या भीतीने तसेच यात सरकारची मदत व्हावी या हेतूने अनेकजण पक्ष सोडत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. कुणी पक्षातून जात असेल तर आपण काही करू शकत नाही. कुण्याच्या जाण्याने पक्ष कार्य थांबत नाही, असेही पवार म्हणाले. हसन मुश्रीफ यांना देखील ऑफर होती मात्र त्यांनी निष्ठेला महत्व दिलं. कदाचित आणखी काही लोकं पक्ष सोडून जातील, त्यांची काळजी आम्ही करत नाही. पवार साहेबांनी आधी सांगितलं होतं नव्या दम्याच्या लोकांना संधी दिली जाईल, त्यामुळे जुन्या नेत्यांच्या मनात भीती निर्माण झाली असावी' असेही ते म्हणाले.