prakasha ambedkar :  "राज्यातील सरकार श्रीमंत मराठ्यांचे सरकार आहे. त्यामुळे गरीब मराठा आरक्षणाचे वाटोळे या सरकारने केले असून आता राज्यात सोमवारी पारीत केलेला ओबीसी आरक्षणाचा कायदा बेकायदेशीर तसेच संविधानाच्या चौकटीत न बसणारा आहे. ओबीसी जनतेने राज्यातील या चोरांच्या अपप्रचाराच्या नादी लागू नये. ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील सरकार अप्रामाणिक आहे," असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 


प्रकाश आंबेडकर यांनी आज शिर्डीत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर टीका केली. ओबीसी आरक्षणावरून सरकार अपप्रचार करत असून निवडणूक आयोगाने त्यांना घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून निवडणूक वेळेवर घ्यावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. 


ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत या महविकास आघाडी शासनाच्या भूमिकेवरून  निवडणूक आयोगाने निवडणुका वेळेवर घ्याव्यात असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. "जुन्या सभागृहाची मुदत संपल्यावर नवीन सभागृह निर्माण करण्याची जबाबदारी घटनेने निवडणूक आयोगाला दिली आहे. कॅबिनेटने दिलेला निर्णय त्यांच्यावर बंधनकारक नाही. विधानसभेत संमत झालेला कायदा सुद्धा निवडणूक आयोगावर बंधनकारक नाही. त्यामुळे घटनेने दिलेली जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडावी, असे आवाहान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले,  "सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे, असा प्रचार केला जातोय. न्यायालयाने मनाई हुकूम केला आहे, आरक्षण रद्द केलंलं नाही. ओबीसी समाजाने चारही पक्षांना मतदान न करता सत्ता हातात घेण्यासाठी प्रयत्न करावेत. ओबीसी समाजाने या चोरांच्या नादी लागू नये. या चोरांना महाराष्ट्रातील तिजोरी लुटायची असून प्रशासकीय यंत्रणेमार्फत लुटमार करायची आहे," असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 


'नारायण राणे यांनी पुरावे न्यायालयात सादर करावेत'
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालीयन हिच्या मृत्यूवरून केलेल्या आरोपांवरही प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. नारायण राणे यांच्याकडे दिशा सालीयनच्या मृत्यूबाबत पुरावे असतील तर त्यांनी त्याचा खेळ करू नये. ते सर्व पुरावे कोर्टात सादर करावे. या विषयाकडे लोक आता राजकारण म्हणून बघू लागले आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यासोबतच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे कमवले त्यांची यादी द्यावी आणि संबंधित प्रकरण न्यायालयात दाखल करावे. संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाला सांगण्यापेक्षा  ते न्यायालयात का जात नाहीत? न्यायालयात गेल्यास न्यायालय या प्रकणाची चौकशी करेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.   


 "भाजप घटनेची पायामल्ली करत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यात पुढाकार घेत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. कॉंग्रेसच्या काळात घटनेची निर्मीती झाली ती काँग्रेसच आज घटनेची पायमल्ली करत आहे. इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेसला लाज असेल तर ते या सरकारमध्ये राहणार नाही. घटना बदलण्यास काँग्रेस भाजप बरोबर आहे असंच दिसत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 


"आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहोत, असा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. परंतु, त्यावर काँग्रेसकडून अद्याप उत्तर आलं नाही. श्रीमंत मराठ्यांची साथ सोडून वंचितला बरोबर घेण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसवर केला आहे. 


महत्वाच्या बातम्या