Akola News अकोलाभाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या पोलिसांवरील वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नितेश राणे यांचा उल्लेख 'वेडा आमदार' असा केलाय. प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांना फार महत्त्व देऊ नये असं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही. यासोबतच पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. 


 नितेश राणे म्हणजे 'वेडा आमदार'


पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस 'सागर' बंगल्यावर बसलाय. तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले होते. माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राणे बोलत होते. त्यानंतर अकोल्यातील एका सभेत भाषण करताना पुन्हा नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या विषयावर बोलताना पोलिसांबद्दल अपशब्द वापरले होते.


पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडीओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील, त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाहीत, आपण पोलिसांना घाबरत नाही, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता राज्यभरातून टीका केली जात आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी देखील नितेश राणेंच्या त्या  वादग्रस्त वक्तव्यावर बोलतांना त्यांना वेडे ठरवले आहे. 


महाराष्ट्राचा अतिसंयमी नेता आज हरपला 


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईला  वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोहर जोशींच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय. 'रिडल्स'च्या वेळेस राज्यात जो वाद निर्माण झाला, त्यावेळी मनोहर जोशींनी अतिशय संयमाने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे आंबेडकर म्हणाले. यासोबतच लोकसभेत सभापती असताना त्यांनी अनेक निकराचे प्रसंग त्यांनी हसत-खेळत सहजपणे निभावून नेल्याचंही आंबेडकर म्हणाले. त्यांच्या कालावधी मध्ये राज्यातील अनेक नाजुक प्रश्न त्यांनी मोठ्या कुशलतेने सांभाळून नेले. त्यात कुणाच्याही मानत कटुता निर्माण होऊ दिली नाही. आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असल्याच्या भावना देखील प्रकाश आंबेडकरांनी बोलतांना व्यक्त केल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या